प्रशांत ननावरे - nanawareprashant@gmail.com
नवीन शहरात फिरायला गेल्यानंतर तिथल्या स्थानिकांचा विश्वासाचा खाद्यअड्डा कोणता, असं विचारल्यानंतर सर्वमुखी एकच नाव येणं हे क्वचित घडतं. कोकण प्रदेशाचा मुकुटमणी असलेल्या रत्नागिरी शहरात मात्र हे सहज घडतं आणि उत्सुकता आणखी शिगेला पोहोचते.
रत्नागिरी शहरात आल्यानंतर इथे पाहुणाचार न घेता माघारी परतणे म्हणजे शहराला भेट न दिल्यासारखेच आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मारुती मंदिर चौकातील हॉटेल गोपाळमध्ये दिवसभर स्थानिक आणि पर्यटकांची उठबस पाहायला मिळते. शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, जुने-नवे मित्र-सहकुटुंब-पाहुण्यांसोबत खादाडी, भेटीगाठी, चर्चेसाठीचा हक्काचा अड्डा म्हणजे हॉटेल गोपाळ. एकेकाळी एक छोटीशी टपरी असणाऱ्या या जागेने आता कात टाकली असली तरी चव आणि दर्जा आजही टिकून आहे. लोकांना आवडतील आणि परवडणारे महाराष्ट्रीयन आणि दक्षिण भारतीय पदार्थ ही ‘गोपाळ’ची खासीयत.
खरंतर खातू कुटुंबीयांचा मूळ व्यवसाय घड्याळकामाचा. आजोबा विठ्ठल खातू आणि वडील श्रीराम खातू हे वॉचमेकर म्हणून प्रसिद्ध होते. खातू यांची सहावी पिढी पऱ्याच्या आळीतील १८५५ साली बांधलेल्या कौलारू घरात आजही वास्तव्यास आहे. एकत्र कुटुंब पद्धतीत राहणाऱ्या खातूंना चाळीस वर्षांपूर्वी नाईलाजाने हॉटेल व्यवसायात उतरावे लागले; मात्र असं असलं तरी कामावरील निष्ठा आणि लोकांना चांगली सेवा देण्याचा मूळ स्वभाव आधीच्या पिढ्यांपासूनच अंगात भिनलेला असल्यामुळे हा व्यवसाय बदल फारसा त्रासदायक ठरला नाही.
रत्नागिरीतील मारुती मंदिर येथे खातू कुटुंबीयांची जागा होती. त्या जागेवर त्यांचे घड्याळाचे दुकान होते आणि थोडी जागा विठ्ठल खातू यांनी एका व्यक्तीला भाड्याने देऊन स्वत:च चहा, वडे, भजी तत्सम पदार्थ विकण्यासाठी हॉटेल काढून दिलेलं. विठ्ठल खातू यांच्या साथीने आणि नंतर श्रीराम खातू यांनी दुकान व जागेची धुरा सांभाळली खरी; परंतु हॉटेलवाल्याने खातूंच्या चांगुलपणाचा गैरफायदा घ्यायला सुरुवात केली. खातू यांचे राहण्याचे ठिकाण दुसरीकडे आणि कामाच्या व्यापात हॉटलवाल्याकडे दुर्लक्ष व्हायला लागले. तो जागा बळकवायला लागल्याचे खातू यांच्या मित्रांच्या लक्षात आल्यानंतर श्रीराम खातूंनी कोर्टाची पायरी चढण्याचा निर्णय घेतला; परंतु कोर्टात खटला लढण्याइतके पैसेदेखील खातू यांच्याकडे नव्हते. त्या वेळी ॲड. गोपाळराव सुर्वे यांनी हा खटला लढला आणि जिल्हा सत्र न्यायालयात पहिल्यांदाच मालकाच्या बाजूने निकाल दिला गेला. उच्च न्यायालयातही खटला खातूंच्याच बाजूने लागला. ही गोष्ट १९८४ सालची. आपल्याकडे पैसे नसताना आणि जागा हातातून गेल्याचे जवळपास निश्चित झाले असताना ॲड. गोपाळ यांच्यामुळे खातूंना जागा आणि हॉटेलची मालकी परत मिळाली. त्याची कृतज्ञता म्हणून खातू कुटुंबीयांनी हॉटेलला ‘गोपाळ’ हे नाव दिले. आज तेच ‘हॉटेल गोपाळ’ रत्नागिरीची ओळख बनले आहे.
हॉटेल ताब्यात मिळाल्यानंतर श्रीराम खातूंनी पत्नी आणि मोठा मुलगा मोहन यांच्या मदतीने व्यवसाय सुरू ठेवला. त्या वेळी रत्नागिरीत निवडक हॉटेल्स होती. मोठ्या कंपन्या नसल्यामुळे माणसांची गर्दी नव्हती. जेके फाईल्स ही एकमेव कंपनी नुकतीच सुरू झाली होती. शहराचा विस्तार मर्यादित होता. तरी जोशी यांच्या उपाहारगृहात बऱ्यापैकी लोकांची गर्दी व्हायची; पण हॉटेलची मालकी खातूंकडे आल्यानंतर काही काळ धंदा मंदावला. लोकं पूर्वीच्या चवीसोबत नवीन चवींची तुलना करू लागले. चव बदलली असली तरी श्रीराम खातूंनी मात्र पदार्थांच्या दर्जाबाबत तडजोड केली नाही. बायको आणि मोठ्या मुलाच्या साथीने लोकांना खातूंची घरची चव आणि सर्वोत्तम सेवा देण्याचा प्रयत्न केला. त्याचा परिणाम असा झाला, की कालांतराने लोकं जुनी चव विसरले आणि त्यांनी नवीन चव स्वीकारली. एव्हाना त्यांचा छोटा मुलगा मृत्यूंजय (लाल्या) व्यवसायात आला होता. खातूंचा बटाटा वडा, भजी, उसळ, मिसळ, पुरीभाजी, चहा ही गोपाळची ओळख म्हणून जम बसवत असताना १९९९ साली श्रीराम खातू निवर्तले. तेव्हापासून आजतागायत खातू कुटुंबातील जुने-नवीन सदस्य मिळून इमानेइतबारे हा व्यवसाय करत आहेत.
शिरा, पोहे, उपीट, उसळ, मिसळ, बटाटा वडा, समोसा, रस्सा वडा, भजी, थालीपीठ हे स्नॅक्सचे पदार्थ तसेच गोपाळ स्पेशल कटलेट, पाव पॅटीस, साबुदाणा वडा, साबुदाणा खिचडी, दही वडा, पुरी भाजी, पाव भाजी आणि मिसळ खाण्यासाठी लोकं आवर्जून येतात. इथे वारानुसार वेगवेगळे पदार्थ मिळतात. सोमवार ते रविवार अनुक्रमे आम्रखंड पुरी, डाळ वडा, काळा वाटाणा उसळ व भाजणी वडा, उपवास मिसळ, कोथिंबीर वडी, उपवासाचं थालीपीठ, गोपाळ स्पेशल मिसळ यामुळे लोकं ठरवून त्या त्या
दिवशी गर्दी करतात. इतरवेळीही वेळेत न गेल्यास हिरमोड होतो. म्हणजे संध्याकाळी चार वाजल्यानंतर मिसळ आणि पाच वाजल्यानंतर दही वडा
संपलेला असतो.
‘गोपाळ’ची नियमित मिसळ हिरव्या वाटाण्याची आणि स्पेशल मिसळ मटकीची असते. नियमित मिसळीसाठी सर्वोत्तम दर्जाचा वाटाणा वापरला जातो, तो विरघळत नाही किंवा त्याची सालंही निघत नाहीत. इथे तर्री वेगळी न करता एकच उसळ बनवली जाते आणि जास्तीची तर्री बनवली जाते, त्यामुळे नंतर घेतल्या जाणाऱ्या अमर्याद तर्रीमुळेही शेवटपर्यंत मिसळीची चव बदलत नाही. मिसळीचा मसाला, गरम मसाला दर महिन्याला बनवून घेतला जातो. सुक्या खोबऱ्याचे ओले वाटप दररोज तयार केले जाते आणि त्यासाठी फक्त राजपुरी खोबरेच वापरले जाते. स्पेशल मिसळीत वरून खवलेलं खोबरं घालून दिलं जाते, सोबत दही आणि ताकही असतं. कोकण आणि नारळ यांचे घट्ट नाते आहे. त्यामुळे इथे पहिल्यांदाच मिसळमध्ये खोबरं चाखायला मिळालं; पण खवलेल्या खोबऱ्याचा हा प्रयोग चांगलाच जमून आला आहे, असंच म्हणता येईल.
वाटाणा, बटाटा, गाजर, बीट, फरसबी या भाज्यांच्या मिश्रणाला रव्याचे कोटींग असलेला कटलेट हा प्रकार हेल्दी आहे. इथला बटाटा वडा लोकप्रिय आहेच; पण समोसादेखील स्पेशल आहे. समोशामध्ये किंचित पावभाजी मसाल्याचा वापर केल्याने तो इतरांपेक्षा वेगळा ठरतो. ठरावीक पदार्थांसोबत दिले जाणारे दही बाजारातून विकत न आणता हॉटेलमध्येच तयार केले जाते. त्या दह्याचा वापर चटण्यांमध्येही केला जातो. बटाटा वडासोबत मिळणारी लसणाची चटणी दह्यात मिसळून दिली जाते. या लसणाच्या चटणीमध्ये एक अतिशय वेगळी गोष्ट वापरली जाते. पाव पॅटीस बनवण्यासाठी ब्रेडच्या स्लाईसच्या कापलेल्या कडांचे ब्रेड क्रम्स बनवून त्याचा चुरा केला जातो आणि लसूण, भजी-वड्याच्या चुऱ्यासोबत त्याचे वाटण केले जाते. ही नवीन पाककृती इतकी भन्नाट आहे वड्यासोबत चटणीदेखील संपवली जाते. वडा, भाजी, मिसळीसोबत दिला जाणारा पाव मऊ-लुसलुशीत असतो. पाव दाबल्यावर पुन्हा जागेवर आला तरंच तो ताजा, असेच पाव इथे खायला मिळतात. यीस्टचा पाव थंडीच्या दिवसात दुपारी दोननंतर कडक व्हायला सुरुवात होते. त्याचे पापुद्रे निघतात. त्यामुळे लोकांना वाटतं की तो खराब आहे; पण पावात तसा फरक पडू नये म्हणून ठरलेल्या बेकरीवाल्याकडूनच तो बनवून घेतला जातो.
दहा-बारा वर्षांपूर्वीच जुना मेन्यू अपडेट होऊन त्यात डोसा, पावभाजी हे पदार्थ दाखल झाले आहेत. सुकी भाजी, रस्सा भाजी, कुर्मा पुरी या गोष्टी दुपारच्या जेवणात मिळतात. सकाळी साडेअकरा ते दुपारी साडेतीन आणि संध्याकाळी साडेसात ते दहा वाजेपर्यंत जेवणाचे पदार्थ मिळतात. इडली, मेदू वडा, डोश्याचे विविध प्रकार, ज्यूस, मिल्कशेक, सबवत, फालुदा यामुळे ‘गोपाळ’चा मेन्यू आता भरगच्च झाला आहे. इथले डिंक लाडू विशेष आहेत. उपवास समोर ठेवून तो बनवला जातो. सुका मेवा, राजापुरी खोबरं, खसखसचा वापर त्यात केला जातो. शिवाय रवा लाडू आणि बेसन लाडूदेखील मिळतात. सर्व लाडूंना इतकी मागणी असते की दर दोन-तीन दिवसांनंतर ते बनवले जातात.
हल्ली हॉटेल व्यवसायात मराठी माणसं कामाला मिळत नाहीत; परंतु इथला संपूर्ण कर्मचारी वर्ग स्थानिक आणि मराठी आहे. बौद्ध, मुसलमान आणि कुणबी समाजातील मुलं-मुली कामाला आहेत. मृत्यूंजय खातू सांगतात, की विठ्ठल कामत यांचे एक तत्त्व आम्ही पाळतो. हॉटेल मालकाने किचनमध्ये काम केलं पाहिजे, भांडी घासली पाहिजेत, तरंच तो व्यवसाय तग धरू शकतो. सर्व खातू कुटुंबीय हे आनंदाने करतात. मृत्यूंजय यांची पत्नी जेतस्वीता, वहिनी वृषाली, पुतण्या कुंतल आणि त्याची बायको हिरण्यमयी यांच्या योगदानामुळे चार दशकांनंतरही ‘गोपाळ’ची लोकप्रियता फक्त टिकून नाहीए तर दिवसेंदिवस वाढतेय. गिऱ्हाईकाला भरून गेलेली खाद्यपदार्थाची प्लेट धुवायला येताना रिकामी असणं हे यशाचं गमक मानलं जातं. हॉटेल गोपाळमध्ये हे ‘याची देही याची डोळा’ पाहता येतं.