Assam Flood : आसाममध्ये संततधारेमुळे दरड कोसळून पाच मृत्युमुखी; दहा हजारांहून अधिक नागरिकांना फटका
esakal June 01, 2025 03:45 PM

गुवाहाटी : आसाममध्ये गेल्या २४ तासांत सततच्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. सहा जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीचा फटका दहा हजार १५० हून अधिक नागरिकांना बसल्याची माहिती आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एएसडीएमए) दिली आहे.

कामरूप जिल्ह्यात शहरात दरड कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. कामरूप महानगर क्षेत्र, कामरूप आणि काछार या तीन भागांतील पाच महसूल मंडलांतील शहरी भागांत पूरस्थिती आहे. दोन मदत शिबिरे अन् एक मदतीचे वितरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. धेमाजी, लखीमपूर अन् गोलाघाट या तीन जिल्ह्यांतील आठ महसूल मंडलांतील नागरी भागांत पूरस्थिती निर्माण झाल्याने त्या सुमारे दोन हजार नागरिकांना फटका बसला आहे.

‘एनडीआरएफ’ आणि ‘एसडीआरएफ’च्या पथकांनी विविध पूरग्रस्त भागांतील रहिवाशांचे स्थलांतर केले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील आपत्ती व्यवस्थापन प्रणालीची कसोटी लागली आहे. संततधारेमुळे दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, शहरी भागांमध्ये पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितले की, ईशान्य भारतातील अनेक भागांवर मोठ्या प्रमाणात ढग संचय झाल्यामुळे आसाममध्ये सततच्या पावसामुळे असामान्य स्थिती निर्माण झाली आहे. कामरूप महानगर, जिल्ह्यांतील सरकारी कर्मचाऱ्यांना शनिवारी विशेष सुटी जाहीर करण्यात आली. या दोन भागांतील शाळा आणि महाविद्यालये शनिवारी बंद ठेवण्यात आली आहेत.

शहरी विकास मंत्री जयंत मल्ला बरुआ यांनी शुक्रवारी सांगितले की, गुवाहाटीच्या उपनगरातील बाँडा परिसरात दरड कोसळून तीन महिलांचा मृत्यू झाला. शहरातील अनेक भागांत मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे प्रभावित नागरिकांना मदत आणि बचावकार्य पुरवण्यासाठी विविध यंत्रणा कार्यरत आहेत.

गुवाहाटी विमानतळावरील विमानसेवा शुक्रवारी मुसळधार पावसामुळे विस्कळीत झाली आहे. आसमात दरवर्षी पावसाळ्यात पूरस्थिती आणि दरड कोसळण्याच्या घटना होत असतात. त्यात वाढ होत आहे. यामुळे राज्य सरकारने आपत्ती व्यवस्थापनासाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.