Nitesh Rane : मुंबई : राज्याचे मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणे हे पुन्हा एकदा वादग्रस्त विधानामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. या आठवड्याच्या शेवटी येऊ घातलेल्या बकरी ईदच्या निमित्ताने ते बोलत होते. आमच्या सणांच्या वेळी फुकटात सल्ले देणारे बकरी ईदच्या वेळी कुठे गायब होतात. बकरी ईदच्या वेळी असे फुकटचे सल्ले का दिले जात नाहीत, असा सवालही त्यांनी यावेळी केला. (nitesh rane warning on bakrid mumbai society)
राज्यातील मंत्री नितेश राणे यांनी यावेळी इशारा देत म्हटले की, एखाद्या सोसायटीत जबरदस्ती जर बकरा कापला गेला तर आमचे हिंदुत्ववादी सरकार त्याच्या विरोधात नक्कीच कारवाई करेल. हा कोणाच्या अब्बाचा पाकिस्तान नाही. तर हे आमचे हिंदू राष्ट्र आहे. इथे शरीया कायदा लागू होत नाही, असेही राणे म्हणाले.
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी म्हटले होते की, कुर्बानी देणे हा आमचा अधिकार आहे. याबाबत राणे म्हणाले की, फटाके फोडणे हा आमचा अधिकार नाही काय? होळी खेळणे हा आमचा अधिकार नाही काय? आम्ही देखील आमच्या सणांसाठी जबरदस्ती करू लागलो तर? आम्हाला होळी खेळण्यापासून का अडवले जाते, फटाके का फोडू दिले जात नाहीत, असा सवालही त्यांनी केला. हिंदूंचा सण असेल तेव्हा हे लोक कोणते ना कोणते मुद्दे समोर आणून तो साजरा होणार नाही, यासाठी प्रयत्नशील असतात, असेही राणे म्हणाले.
हेही वाचा – Salman Khurshid : देशभक्त होणे एवढे कठीण असते का? टीकेचे धनी झाल्यावर खुर्शीद यांनी व्यक्त केली खंत
नितेश राणे म्हणाले की, जेव्हा आमचे हिंदूंचे सण असतात, तेव्हा आम्हाला अनेक सल्ले दिले मिळतात. कोरडी होळी खेला, पर्यावरण पूरक होळी खेळा. दिवाळी येते तेव्हा आम्हाला सांगितले जाते की, फटाके फोडू नका. यामुळे पर्यावरणाचे नुकसान होते. आता तेच लोक, जे आम्हाला फुकटात सल्ले देतात, ते बकरी ईदच्या वेळी पर्यावरणपूरक बकरी ईद साजरी करा, असे का सांगत नाहीत? व्हर्च्युअली बकरा कापा, असं का सांगितलं जात नाही? बकरी ईदला हजारो बकरे कापले जातात, तर यावेळी आम्ही पर्यावरणपूरक ईद साजरी करू असा विचार मुसलमान समाज का करत नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले की, हिंदूंना सल्ला देणारे पर्यावरण प्रेमी, प्राणी प्रेमी आता कुठे गेले? बकरा कापण्यासाठी परवानगी दिली जातेच कशी? जर मुसलमान समाजाने हा बदल करण्यासाठी पुढाकार घेतला तर त्यामुळे खूप मोठा फरक पडेल, असेही ते म्हणाले.
जेव्हा आम्हाला कोरडी होळी खेळा, असे सांगितले जाते तेव्हा आम्ही रंग खेळत नाही. 10 नंतर फटाके फोडू नका, असे सांगितले जाते, तेव्हा आम्ही ते फोडत नाही. आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेनुसार चालतो, शरिया कायद्याने नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. जे नियम हिंदू पाळतात ते मुसलमान समाज का पाळत नाही, असा माझा प्रश्न असल्याचेही ते म्हणाले.