डॉ. विजया वाड - editor@esakal.com
एकनाथ आव्हाड हे लहान-मोठ्या वाचकांचे आवडते लेखक आहेत. साहित्य अकादमीचा ‘बालसाहित्य’साठीचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्यांचे तीन बालकथासंग्रह सकाळ प्रकाशनाने प्रकाशित केले आहेत.
आव्हाड यांच्या ‘घरभर दरवळणारा सुगंध’ या बालकथासंग्रहात एकूण बारा कथा आहेत. या कथा वाचताना त्या तुमच्याच कथा आहेत असे वाटेल. बाल आणि समस्त वाचक वर्गाला एक वेगळाच आनंद देऊन जातील या साऱ्या कथा. ज्येष्ठ साहित्यिका उमा कुलकर्णी यांची प्रस्तावना लाभणे हे या पुस्तकाचे भाग्य. प्रस्तावनेत त्या म्हणतात, प्राणिजीवन, भूतदया, निसर्गाकडे बघायचा निकोप दृष्टिकोन या गोष्टींकडे देखील लेखक चिमुकल्यांचे लक्ष वेधून घेतात. बालवाचकांच्या मनातल्या विविध संवेदनांना साद घालतात. पुस्तक वाचताना याचा आपल्याला नक्कीच प्रत्यय येतो. मला वाटतं, या पुस्तकातील साऱ्या कथा ह्या आनंद देणाऱ्या आणि संस्कार करणाऱ्या कथा आहेत.
आपली आईच आपल्यासाठी विठाई ही कथा एकनाथ आव्हाडांच्या लेखनाचे बलस्थान आहे. दिवसाची सुरुवात ते झोपू झोपू होईपर्यंत, आईची साथसोबत बाळू, शमीसाठी खूप मोलाची असते. आईबाबांची ही साधी सोपी कथा हृदयाचा ठाव घेते. ‘सविता पाटेकर’ या वर्गात सतत गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थिनीकडे शिक्षकाचे लक्ष जाते, ही एकनाथ आव्हाडांची कथा माझ्या अजून स्मरणात आहे. कथा रंगवून सांगण्याचे सामर्थ्य आव्हाड यांच्या जवळ आहे. या पुस्तकात भावा-बहिणीचे अतूट प्रेम ‘ओवाळणी’ या कथेत सुंदर पद्धतीने आले आहे. विषयांची विविधता आणि त्यातील नावीन्य जपत या कथा आपल्याला पुढे पुढे नेतात. उत्कंठा वाढवतात.
मनी वसे ते स्वप्नी दिसेया पुस्तकात एकूण दहा कथा आहेत. ज्येष्ठ समीक्षक प्रा. सुहासिनी कीर्तिकर यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभली आहे. प्रस्तावनेत त्या म्हणतात, आव्हाडांचा लेखन हेतू हसतखेळत, कथाकहाण्या सांगत, तुमच्याशी संवाद साधत तुम्हाला आनंद देण्याचा आणि नकळत घडवण्याचाही. मात्र याच्यासाठी ते ‘दुसरी सुंदर दुनिया’ कल्पनेने नाही उभारत. तुमच्यासाठी ते जशा थोरामोठ्यांच्या गोष्टी सांगतात तशाच तुमच्या आमच्या कुटुंबातल्याही गोष्टी ते सांगतात. हे सांगणंच प्रभावी असल्यामुळे ते आपल्यापर्यंत सहज पोहोचतं. मला वाटतं, या पुस्तकातील गोष्टी वाचता वाचता गोष्टींमधला आशय आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचतो आणि आतल्या आत झिरपतही जातो. वाचनाचे महत्त्व सांगणारी चिमुकल्यांचा अभिनव असा ‘आमचाही वाचनकट्टा’ ही कथा आपणही आपल्या घरात असं वाचनकट्टा सुरू करू शकतो. असा विचार नकळत आपल्यात रुजवते. चिमुकल्यांच्या हातांची ताकद काय करामत घडवू शकते त्याचे मूर्तिमंत दर्शन ‘चिमुकल्या हातांची ताकद’ या कथेतून घडते. मुलांची कमाल गॅदरिंगची धमाल ही कथा मुळापासून वाचूनच त्याचा आनंद घ्यावा.
अखेर सापडली वाटया पुस्तकात एकूण अकरा कथा आहेत. या पुस्तकाला अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या माजी अध्यक्ष, ज्येष्ठ लेखिका प्रा. उषा तांबे यांची प्रस्तावना आहे. प्रस्तावनेत त्या म्हणतात, जे विषय आम्ही लहानपणी ऐकलेसुद्धा नव्हते ते आजच्या मुलांच्या जाणीव-नेणिवेत ठळकपणे येत आहेत. मुलांनी काय बघावे, वाचावे, ऐकावे यावर ताबा ठेवणे शिक्षक किंवा पालक यांच्या हातात राहिले नाही. अशावेळी, आशावादी कथा त्यांना दिलासा देऊ शकतात. परंतु त्या वास्तवाकडे दुर्लक्ष करणाऱ्या असता कामा नयेत. कारण मुलं वास्तव पाहतात, ऐकतात, अनुभवतात. अशा कठीण परिस्थितीतही मार्ग निघतो, काढता येतो. आयुष्यात अनेक आनंदाची बेटं आहेत, ती सुंदर करता येतात, असा विश्वास बालवाचकांना देणाऱ्या आव्हाड यांच्या या कथा आहेत. आशादायी, आनंददायी, प्रेरणादायी. एकूणच ही तीनही पुस्तके मुलांची असली तरी मोठ्यांनीही ती जरूर वाचावीत अशीच आहेत. या तीनही पुस्तकांना चित्रकार संतोष घोंगडे यांनी सुरेख चित्रांकन करून सजविले आहे. आव्हाड यांची प्रत्येक कथेतील साधी सोपी पण वळणदार भाषा आणि मनाला आकर्षित करून घेणारा आशय आपल्याला प्रत्येक कथेत वाचायला मिळतो.
पुस्तकांची नावेघरभर दरवळणारा सुगंध,
पृष्ठे : ८४
मूल्य : १५० रुपये.
मनी वसे ते स्वप्नी दिसे,
पृष्ठे : ७२
मूल्य : १४० रुपये.
अखेर सापडली वाट,
पृष्ठे : ७८
मूल्य : १४० रुपये
लेखक : एकनाथ आव्हाड
प्रकाशक : सकाळ प्रकाशन, पुणे (९८८१५९८८१५, ८८८८८४९०५०)