>> प्रा? विश्वास वसेकर
माणसाला देवानं प्रगत मेंदू दिला. मानवेतर प्राण्यांना माणसाची सगळी ज्ञानेंद्रिये दिली. पण स्पर्श करायला हात मात्र दिले नाहीत. हात हे स्पर्शसंवेदनेचे मुख आहे. एखादा स्पर्श हा समोरच्या वस्तूचं रूप बदलून टाकू शकतो. या सामर्थ्यामुळे एखाद्या शैलीलाच आपण शब्द वापरतो, ‘टच्’ उदाहरणार्थ हिंदी चित्रपटाचा ‘गुलजार-टच!’ स्पर्शाने माणसं जवळ येतात. एक नातं, एक अनुबंध निर्माण होतो.
ज्यांनी लिहिलेली प्रत्येक ओळ प्राणप्रिय आहे, असे लेखक कवी आहेत ग्रेस. त्यांच्या लेखनात सर्जनाचे, कलेचे, पुस्तकांचे म्हणून जेवढे उल्लेख आले आहेत, ते सगळे अट्टहास करून मिळविणं, वाचणं हे एक उद्दिष्टच होऊन बसलं आहे. एकदा वसंत बापटांनी भाषण करताना हातांची अशी हालचाल केली की ती पाहून ग्रेसना त्यांची कविता आठवली, ‘हे तुझे तळहात भोळे, जाणती नाना कळा.’ ही कविता मी शोध शोध शोधली, पण मिळेना. नंतर सेलूला वसंत बापटांचा कार्यक्रम होता. त्यांना ही कविता वाचा असं दिवसभर मी टुमणं लावलं. पण त्यांनी काही ऐकलं नाही. शेवटी ‘शततारका’ आला, त्यात ती होती.
या कवितेत स्पर्शसुखाचे आगर आहे ः तुझ्या अंगुलीला दिव्यचक्षू लाभल्याने माझा देह रातांधळा झाला. तुझे हात कधी मौनी होतात, कधी रडतात, कधी हसतात, कधी जाळतात, कधी लाडात येतात, कधी बोलतात, कधी बोलावतात, तर कधी मुके, सांत्वन करून मनाला चिंब करतात. छे, या कवितेतलं माझं सांगणं किती गद्य होतंय. या ओळीच वाचा ना.
या करांच्या अग्रभागी मखमलीची लेखणी
कोरली अंधारलेणी तू कितीदा देखणी
रुक्ष या तळव्यावरी तू बीज जेव्हा पेरले
या नसांची वेल झाली आणि रक्ताची फुले
... हॅट्स ऑफ टू वसंत बापट अँड ग्रेस…!
माणसाला देवानं प्रगत मेंदू दिला. मानवेतर प्राण्यांना माणसाची सगळी ज्ञानेंद्रिये दिली. पण स्पर्श करायला हात मात्र दिले नाहीत. हात हे स्पर्शसंवेदनेचे मुख आहे. म्हणून तर त्याला बोटाच्या पाच जिभा आहेत, असं आनंद यादव यांनी लिहिलंय. आनंद यादव मराठी साहित्यात स्पर्श-संवेदनेचं चित्रण करणारे सर्वश्रेष्ठ लेखक आहेत. दुसरेही आनंदच आहेत. पण साधले. या दोन लेखकांनी माझी स्पर्शसंवेदना शहाणी बनविली आहे.
सर्वात प्रिय असतो कोवळिकीचा स्पर्श. जगात जेवढी म्हणून कोवळीक आहे ती हातांनी पिऊन घेता आली पाहिजे. हिवाळ्यातलं उन्ह, धान्याला आलेले मोड, तान्हं मूल, झाडांची पालवी, दवबिंदू, चांदणं, शिरीषादी सगळी फुलं, मऊ मऊ पाणी, मृदुतम लोणी, सुंदरीचं सर्वांग, फुलपाखराच्या पंखांवरची रंगीत पावडर, लुसलुशीत लॉन, मोरपीस, सुरळी नावाचा पिठल्याच्या वडय़ाचा गुजराती पदार्थ, मांडे, मखमल, धुकं.. किती कितीक कोवळिकीने भरलंय हे जग. राठ, जंगली आणि धसमुसळ्या माणसाला त्यात वावरायचा, जगायचा अजिबात हक्क नाही. द. भि. कुलकर्णी यांना किम एकदा म्हणाली होती, ‘अरे, ते कृष्णकमळाचं फूल इतकं सुरेख होतं की त्यावरून जीभ फिरवावीशी वाटली.’
‘काय खायचा वगैरे विचार होता का?’
‘नाही रे बाबा, स्पर्श तर करावासा वाटे, पण आपले हात त्याच्यापुढे राठ राठ आहेत असं वाटलं.’
स्पर्श हे विलक्षण मनोनित असं सुख आहे. तुमचे शरीरमन त्यासाठी सिद्ध नसेल तर स्पर्श होईल, पण त्याचे सुख होणार नाही. तुम्ही विमनस्क असताना तान्हं बाळ सांभाळायला तुमच्याजवळ दिलं तर त्याच्या जावळांचा, गालाचा, मऊमऊ तळव्याचा सुंदर स्पर्श तुम्हाला जाणिवेच्या पातळीवर नेणारच नाही. तान्हं मूल हे स्पर्शसुखाचं केवढं निधान असतं. गंमत म्हणून तान्हुल्याच्या इवल्या तळव्यात एक बोट ठेवा. असुरक्षिततेच्या भावनेने असेल किंवा चाळा म्हणून असेल ते तुमचं बोट घट्ट धरून ठेवतं. ते सोडविण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. पण कशाला करायचे असले प्रयत्न?
या तान्हुल्या स्पर्शसुखापेक्षा जगात एक भारी स्पर्शसुख आहे आणि ते फक्त एकदाच वनस्पतीशास्त्राचे प्रा. श्री. द. महाजन यांनी अनुभवलं.
शाळेतून हा मुलगा घरी आला की, आधी वेलीजवळ जात असे. वेलीच्या टेंड्रीलबद्दल (पागोरा) खूप कुतूहल. त्या बाजूचा कसला तरी आधार कसा घेतात? त्याभोवती स्प्रिंगसारखं कसं गुंडाळतात, याबद्दल भारीच उत्सुकता होती. प्रत्यक्ष ही प्रक्रिया अनुभवायची असा ध्यास घेऊन एकदा हा रात्रभर वेलीसमोर बोट धरून बसला. रात्री दोनच्या सुमारास ती वेल याच्या बोटाला स्पर्श करू लागली. तो पागोरा. त्याने परत 360 अंश वर्तुळात यापेक्षा चांगला आधार नाही ना ते पाहिले आणि मग बोटाभोवती गुंडाळायला सुरुवात झाली. सकाळपर्यंत बोटाभोवती सगळं गुंडाळलं गेलं होतं. किती सुंदर अनुभव! एरवी या वेली मिळवतात तो निर्जीव मजबूताचा आधार. या वेळी श्री. द. महाजन होते. त्यांचा हा अनुभव वाचतानादेखील मी रोमांचित झालो.
स्पर्शाने माणसं जवळ येतात. एक नातं, एक अनुबंध निर्माण होतो. फासला नजरों का धोका भी हो सकता है, दिल मिले या न मिले, हाथ मिलाते रहिये.’ मध्यंतरी फ. मुं. शिंदे यांनी हस्तांदोलनाची एक वेगळीच लकब चालविली होती. हात मिळवून झाला की, ते आपल्या अंगठय़ाच्या सांध्याजवळ कुटकन मोडायचे. असं छान आणि मनमोकळं वाटायचं. अभिवादनाची पाश्चात्य पद्धत भारतीय नमस्कारापेक्षा चांगली आहे. कारण ती स्पर्शाधिष्ठित आहे.
हिवाळ्यातल्या उन्हाच्या स्पर्शावर अनेक कविता आहेत. उष्ण कटिबंधातल्या माझ्या वाटय़ाला ते येतेच मुळी थोडे. एका हिवाळ्यात वर्षभर पुरेल एवढे ‘व्हिटॅमिन डी’ साठवून ठेवले पाहिजे. उन्हाळा योगी, पावसाळा रोगी आणि हिवाळा भोगी असतो. उन्हाच्या रूपात हा हिवाळा मनसोक्त भोगला पाहिजे. पितात सारे गोड हिवाळा.
एखादा स्पर्श हा समोरच्या वस्तूचं रूप बदलून टाकू शकतो. या सामर्थ्यामुळे एखाद्या शैलीलाच आपण शब्द वापरतो, ‘टच!’ उदाहरणार्थ हिंदी चित्रपटाचा ‘गुलजार-टच्’ तसा तो व्यक्तिमत्त्वाच्या मार्दवा संदर्भानेही येतो. कोंभाची लवलव अनुभवणाऱया ज्ञानेश्वरांमध्ये असे भूमीचे मार्दव होते. शब्दांतून स्पर्शसंवेदना जागवावी ज्ञानेश्वरांनीच. यासारखे मृदू स्पर्शाच्या हळुवारपणाचे लोभस वर्णन त्यांनीच करावे.
पार्थिव स्पर्शाच्या ओढीचा एक सुंदर प्रसंग गो. वि. करंदीकरांनी ‘स्पर्शाची पालवी’ या ललितबंधात सांगितला आहे. नेहरूंना पाहिल्यावर तुला काय वाटले असा प्रश्न त्यांनी एका मुलाला विचारला. तेव्हा त्याने उत्तर दिले. ‘त्यांना हात लावून पाहावा, असे वाटले.’ मलासुद्धा मुद्दाम सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा हस्तस्पर्श अनुभवायचा आहे. पार्थिव स्पर्शाची तहान अशी विलक्षण असते.