अमरावती : आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाच्या ध्येयधोरणांशी प्रामाणिक आणि पक्षाने दिलेली कामे पूर्ण करणाऱ्या मेरिट कार्यकर्त्यांचाच तिकिटांसाठी विचार केला जाईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
स्थानिक व्यंकटेश लॉन येथील सभागृहात शनिवारी (ता.३१) भाजप पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर माजी खासदार नवनीत राणा, जिल्हाध्यक्षव्दय रवीराज देशमुख, प्रभुदास भिलावेकर, शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे, आमदार प्रवीण तायडे, आमदार प्रताप अडसड, आमदार उमेश यावलकर, आमदार केवलराम काळे, माजी मंत्री प्रवीण पोटे, जयंत डेहणकर, शिवराय कुलकर्णी, प्रा. रवींद्र खांडेकर, निवेदिता चौधरी, रमेश बुंदिले, किरण महल्ले, शेखर भोयर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना पालकमंत्री बावनकुळे म्हणाले की, भाजपने नेहमीच जमिनीवरील कार्यकर्त्याला संधी दिली आहे. पक्षाकडून येणाऱ्या काळात विविध समाजोपयोगी कार्यक्रम देण्यात येणार असून ते कार्यक्रम काटेकोरपणे राबविणाऱ्या कार्यकर्त्याला तिकिटांसाठी कुणाकडेही जाण्याची वेळ येणार नाही, पक्षच त्याची दखल घेणार असल्याचे ते म्हणाले.
आगामी निवडणुकीच्या अनुषंगान मनपाकरिता पाच, जि. प. करिता पाच, नगरपरिषदेसाठी तीन पदाधिकाऱ्यांची कोअर टीम तयारी केली जाणार आहे. त्या टीमच्या साह्याने खऱ्या कार्यकर्त्याचा उमेदवारीसाठी विचार केला जाईल तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी तयार राहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
वृक्षारोपण मोहीमपाच जूनपासून राज्यात तसेच जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणाची मोहीम पक्षातर्फे राबविण्यात येणार असून त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याला बूथनिहाय नियोजन करायचे आहे. प्रत्येक घरी एक वृक्ष लावण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांना दिली जाणार असून ती जबाबदारी पूर्ण निष्ठेने पार पाडावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.