RCB vs PBKS Final: ठरलं! १८ वर्षांची प्रतिक्षा संपणार, IPL स्पर्धेला यंदा नवा विजेता मिळणार
esakal June 02, 2025 08:45 AM

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेतील अंतिम दोन संघ अखेर निश्चित झाले आहेत. रविवारी (१ जून) पंजाब किंग्सने पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सला क्वालिफायर २ सामन्यात पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला आहे. त्यामुळे पंजाब किंग्स आयपीएल २०२५ मध्ये अंतिम सामन्यात पोहणारा दुसरा संघ ठरला आहे.

यापूर्वी क्वालिफायर १ सामन्यात पंजाब किंग्सला पराभूत करत अंतिम सामन्यात धडक मारली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स असा सामना पाहायला मिळणार आहे.

अंतिम सामना मंगळवारी (३ जून) जगातील सर्वात मोठे स्टेडियम असलेल्या अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियवर होणार आहे. हे दोन संघ अंतिम सामन्यात आल्याने यंदा आयपीएलला नवा विजेता मिळणार हे निश्चित झाले आहे. कारण आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांनी आत्तापर्यंत एकदाही आयपीएलचे विजेतेपद जिंकलेले नाही.

दरम्यान, पंजाब किंग्सने ११ वर्षांनी, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ९ वर्षांनी आयपीएलचा अंतिम सामना गाठला आहे. पंजाबने यापूर्वी २०१४ मध्ये पहिल्यांदा अंतिम सामना खेळला होता. बंगळुरूने २००९, २०११ आणि २०१६ मध्ये अंतिम सामना खेळला आहे. मात्र या दोन्ही संघांना त्यांनी याआधी खेळलेल्या अंतिम सामन्यात विजय मिळवता आलेला नाही.

२०१४ मध्ये पंजाबला अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने पराभूत केले होते. बंगळुरूला २००९ मध्ये डेक्कन चार्जर्सने, २०११ मध्ये चेन्नई सुपर किंग्सने आणि २०१६ मध्ये सनरायझर्स हैदराबादने अंतिम सामन्यात पराभूत केले होते.

त्यामुळे अजूनतरी पंजाब आणि बंगळुरू हे विजेतेपदाच्या प्रतिक्षेत आहे. पण आता हे दोन्ही संघ अंतिम सामन्यात पोहचल्याने एकाचं विजेतेपदाचं स्वप्न पूर्ण होणार आहे.

विशेष म्हणजे पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन संघ २००८ पासून म्हणजेत पहिल्या आयपीएल हंगामापासून या स्पर्धेचा भाग आहेत. मात्र, या दोन्ही संघांना पहिल्या विजेतेपदासाठी १८ वर्षांची प्रतिक्षा करावी लागली आहे. आता या दोन्ही संघांपैकी कोण ही १८ वर्षांची प्रतिक्षा संपवून आयपीएलची ट्रॉफी पहिल्यांदा उचलणार हे पाहावे लागणार आहे.

पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२५ मध्ये शानदार कामगिरी केली आहे. हे दोन्ही संघ यंदाचे अव्वल दोन संघ आहेत. साखळी फेरीनंतर पाँइंट्स टेबलमध्ये पंजाब किंग्स अव्वल क्रमांकावर, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दुसऱ्या क्रमांकावर होते.

या दोन्ही संघांनी प्रत्येकी १४ सामन्यांपैकी ९ सामने जिंकले आणि ४ सामने पराभूत झाले, तसेत १ सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे दोन्ही संघांचे १९ गुण होते. पण नेट रन रेटच्या फरकामुळे पंजाब अव्वल, तर बंगळुरू दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.