नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा मलीन करण्याच्या एका योजनाबद्ध षडयंत्राचा भाग म्हणून भाजप आमदार नितेश राणे काम करत असल्याचा गंभीर आरोप राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी नितेश राणे यांच्यावर केला आहे. नागपूरमध्ये बोलताना त्यांनी सांगितले की, नितेश राणे वारंवार मुख्यमंत्री फडणवीस यांचे नाव घेऊन वादग्रस्त आणि मुस्लिम समाजाला चिथावणारे वक्तव्य करतात, ज्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिमा खराब होत आहे.( Nitesh Rane : Devendra Fadnavis’ image is being tarnished because of Rane, criticism from the Minorities Commission Chairman )
नितेश राणे भारतीय मुसलमान आणि पाकिस्तानी मुसलमान असा भेद करत आहेत. बकरी ईदसंदर्भात देखील त्यांनी अतिशय वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. यासंदर्भात राज्य अल्पसंख्याक आयोगाकडे आतापर्यंत नितेश राणे यांच्याविरोधात तब्बल 40 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अशी माहीती प्यारे खान यांनी दिली.
खान पुढे म्हणाले, जेव्हा वर्च्युअल ईद साजरी करण्याचा कायदा येईल, तेव्हा ती वर्च्युअल साजरी केली जाईल. सध्या जे कायदे अस्तित्वात आहेत, त्यानुसारच ईद साजरी केली जाते. राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा आहे, तो सर्वांनी पाळावा लागेल.”
“नितेश राणे वारंवार देवेंद्र फडणवीस यांचे नाव वापरून राजकारण करतात. ते महाराष्ट्राला बरबाद करण्यामागे लागले आहेत. भारतात राहणारे मुस्लिम प्रामाणिक आहेत, पाकिस्तानात गेलेले बेईमान होते. बकरीच्या व्यापारावर अनेकांचे रोजगार अवलंबून आहेत. बकरा बळी संदर्भात दोन्ही समाजांवर अन्याय होतो. देवेंद्र फडणवीस फक्त हिंदू समाजाचे नाही, तर सर्व धर्मियांचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्यावर बोलण्यापूर्वी नितेश राणेंनी स्वतःची छबी तयार करावी, असेही म्हणाले.
प्यारे खान म्हणाले, “देवेंद्र फडणवीस केवळ महाराष्ट्राचे नेते नाहीत, त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख आहे. नितेश राणेंनी आपले मत व्यक्त करताना इतरांचा वापर करू नये. त्यांच्यावर फडणवीस यांचे खरे संस्कार असते, तर ते अशा प्रकारे वागले नसते. मी फडणवीस व गडकरी यांच्यासारख्या नेत्यांच्या संस्कारात वाढलोय. गोवंश हत्या बंदी कायद्याचे पालन हे केवळ कायद्याच्या आधारावरच नव्हे, तर कुराणातही नमूद आहे.”
“भाजप सरकार हे एक ईमानदार सरकार आहे. इथे चुकीचं काही चालणार नाही. भाजप कधीच वाकडं बोलणाऱ्यांना पाठीशी घालत नाही. उलट अशा लोकांना बाजूला करण्याचं काम भाजपने वेळोवेळी केलं आहे. त्यामुळे नितेश राणेंचा नंबरही लागण्याची शक्यता आहे,” असे सूचक वक्तव्य करत प्यारे खान यांनी नितेश राणे यांच्याविरोधात लवकरच मुख्यमंत्र्यांकडे अधिकृत तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला आहे.