इंडियन्स प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत पंजाब किंग्सने अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी सुरू झालेल्या क्वालिफायर २ सामन्यात पंजाबने मुंबई इंडियन्सचा मध्यरात्री ५ विकेट्सने पराभव केला.
या विजयासह आयपीएलमध्ये दुसऱ्यांदा अंतिम सामन्यात पोहचले आहेत. यापूर्वी २०१४ मध्ये पंजाबने अंतिम सामना गाठला होता. पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. रविवारी पंजाबच्या विजयाचा शिल्पकार कर्णधार श्रेयस अय्यर ठरला.
पंजाब किंग्ससमोर विजयासाठी २०४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग पंजाब किंग्सने १९ षटकात ५ विकेट्स गमावत २०७ धावा करत पूर्ण केला. श्रेयस अय्यरने नाबाद अर्धशतकी खेळी केली.
दरम्यान, या पराभवामुळे मुंबई इंडियन्सचे सहाव्या आयपीएल विजेतेपदाचे स्वप्न यंदा तरी भंगले आहे. मुंबईचे आयपीएल २०२५ मधील आव्हान या पराभवासह संपुष्टात आले. विशेष म्हणजे पहिल्यांदाच मुंबई इंडियन्सविरुद्ध प्रतिस्पर्ध्यांनी २०० पेक्षा अधिक धावांचा पाठलाग करून सामना जिंकला आहे.
आता पंजाब किंग्सला अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना करायचा आहे. अंतिम सामना मंगळवारी (३ जून) अहमदाबादमध्येच होणार आहे.
क्वालिफायर २ सामन्यात २०४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्सकडून प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग यांनी सलामीला फलंदाजी केली होती. पण प्रभसिमरनला तिसऱ्याच षटकात ट्रेंट बोल्टने रिस टोप्लीच्या हातून झेलबाद केले.
पण नंतर प्रियांश आणि जोश इंग्लिस यांनी डाव सावरला. जोश इंग्लिसने ५ व्या षटकात जसप्रीत बुमराहविरुद्ध २० धावा फटकावल्या. पण त्यांची भागीदारीही फार काळ अश्वनी कुमारने टिकू दिली नाही. त्याने प्रियांश आर्यला २० धावांवर हार्दिक पांड्याच्या हातून झेलबाद केले.
पण नंतर जोश इंग्लिसला कर्णधार श्रेयस अय्यरची साथ मिळाली. पण हार्दिक पांड्याने ८ व्या षटकात आक्रमक खेळणाऱ्या इंग्लिसला ३८ धावांवर बाद करत पंजाबला मोठा धक्का दिला. त्याने २१ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकार मारले.
तो बाद झाल्यानंतर मात्र श्रेयस अय्यर आणि नेहल वढेरा यांनी धावांची गती कमी होऊ दिली नाही. त्यांनी चौथ्या विकेटसाठी महत्त्वाची ८४ धावांची भागीदारी केली. पण ही भागीदारी १६ व्या षटकात अश्वनी कुमारने तोडली. त्याने वढेराला मिचेल सँटेनरच्या हातून झेलबाद केले.
वढेराने २९ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ४८ धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर शशांक सिंगही १७ व्या षटकात २ धावांवर धावबाद झाला. पण श्रेयस अय्यरने आपली लय कायम ठेवताना अर्धशतक केले.
श्रेयसने नंतर १९ व्या षटकात ४ षटकार ठोकत पंजाब किंग्सच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्यानेच पंजाबसाठी विजयी षटकारही खेचला. श्रेयस अय्यर ४१ चेंडूत ५ चौकार आणि ८ षटकारांसह ८७ धावांवर नाबाद राहिला. मार्कस स्टॉयनिस २ धावांवर नाबाद राहिला.
मुंबई इंडियन्सकडून गोलंदाजी करताना अश्वनी कुमारने २ विकेट्स घेतल्या. ट्रेंट बोल्ट आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
तत्पुर्वी, पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले होते. मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ बाद २०३ धावा केल्या.
मुंबईकडून तिलक वर्माने २९ चेंडूत ४४ धावा केल्या. सूर्यकुमारने २६ चेंडूत ४४ धावा केल्या. तसेच जॉनी बेअरस्टोने २४ चेंडूत ३८ धावांची आणि नमन धीरने १८ चेंडूत ३७ धावांची खेळी केली.
पंजाबकडून गोलंदाजी करताना अझमतुल्ला ओमरझाईने २ विकेट्स घेतल्या. काइल जेमिसन, मार्कस स्टॉयनिस, विजयकुमार वैशाख आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.