पुणे : ‘‘शेतीला तंत्रज्ञानाची जोड देऊन उत्पन्न वाढीसाठी कृषी हॅकेथॉनचे आयोजन केले आहे. कृषी क्षेत्रात अत्याधुनिक वापराबरोबरच हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना आत्मसात करण्यासाठी राज्यात सहा विभागांमध्ये ‘सेंटर फॉर इनोव्हेशन ॲण्ड डेव्हलपमेन्ट इन स्मार्ट ॲग्रिकल्चर (सीडसा) केंद्र स्थापन करण्यात येतील,’’ अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढाकारातून कृषी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि कृषी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित पुणे आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉनचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते रविवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, आमदार बाबाजी काळे, चेतन तुपे, बापू पठारे, कृषी आयुक्त सूरज मांढरे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, माजी कृषी आयुक्त उमाकांत दांगट, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे महासंचालक प्रशांत गिरबने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘‘अमरावती, नागपूर, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर व कोकण विभागात ‘सीडसा’चे केंद्र सुरू केले जातील. त्यासाठी ३० जून रोजी मांडण्यात येणाऱ्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये ९० कोटी रुपयांची तरतूद केली जाईल. शेतकरी विविध प्रयोग करून शेती करत आहेत. आता तरुणांना कृषी क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. यासाठी नवनवीन तंत्रज्ञान शेतीत येऊन शेती शाश्वत झाली पाहिजे. यासाठी राज्य सरकार शेतीमधील कृत्रिम बुद्धिमत्तेला (एआय) प्रोत्साहन देत आहे. शाश्वत शेती करताना, रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या वापरांवर नियंत्रण आणत ग्राहकांनाही दर्जेदार शेतमाल मिळाला पाहिजे, यासाठीही तंत्रज्ञानाचा वापर वाढला पाहिजे. यासाठीच्या तंत्रज्ञान वापराला सरकारचे पाठबळ आहे.’’
कृषिमंत्री कोकाटे म्हणाले, ‘‘भविष्यात कृषिक्षेत्रात मनुष्यबळाअभावी अडचणी निर्माण होणार आहेत. ही अडचण समजून कर्नाटकमध्ये ४० आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी एकत्र येत, कृषी क्षेत्रातील मानवरहित अवजारे आणि तंत्रज्ञान विकसित करत आहेत. या तंत्रज्ञानाच्या वापरातून महाराष्ट्रातील शेती संरक्षित, सुरक्षित आणि शाश्वत करण्याचे धोरण आहे. यासाठी कृषी हॅकेथॉनच्या माध्यमातून नवनवीन संशोधन शेतीमध्ये येईल.’’
शेतमाल तपासणीसाठी प्रयोगशाळा‘‘सध्या शेतमालावर कीटकनाशक फवारणी मोठ्या प्रमाणात केली जाते. त्याचा परिणाम ग्राहकांच्या आरोग्यावर होतो. ग्राहकांना चांगला शेतमाल देण्याची गरज आहे. त्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठामधील सध्या असलेली प्रयोगशाळा औंधमधील पशुसंवर्धन विभागाच्या प्रयोगशाळेच्या धर्तीवर सुविधांयुक्त करण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत केली जाईल,’’ असे आश्वासनही पवार यांनी दिले.
अजित पवार म्हणाले...कृषी क्षेत्रावर हवामान बदलाचे मोठे संकट
मे महिन्यात कधी पाऊस पडत नव्हता. मात्र, जूनची सरासरी मे मध्येच भरून निघाली
बारामतीत सरासरी १४ इंच पाऊस पडतो. तो पाऊस मे महिन्यातच १३ इंच होऊन गेला
हवामान बदलांच्या संकटात शेती आणि शेतकरी सापडला आहे
तंत्रज्ञान वापरातून शेती शाश्वत करण्याचे प्रयत्न सुरू