भरधाव वेगामुळे दोघांचा मृत्यू
गोवंडी आणि चेंबूर येथील घटना
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : भरधाव वाहनाच्या धडकेत गोवंडी आणि चेंबूर येथील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
मूळचे उत्तर प्रदेशमधील रहिवासी असलेला विकास रामराज यादव (वय २४) हा कुटुंबीयांसोबत खारदांडा परिसरात राहत होता. त्यांच्या कुटुंबीयांचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे. विकास व त्याचे वडील शनिवारी (ता. ३१) रिक्षाने वाशी येथून भाजीपाला खरेदी करून परत येत असताना मानखुर्द परिसरात त्याच्या रिक्षाच्या पुढे चाललेल्या टोईंग व्हॅनने अचानक ब्रेक दाबला. यामध्ये विकास चालवत असलेल्या रिक्षाची टोईंग व्हॅनला जोराची धडक बसली. या टोईंग व्हॅनचा लोखंडी हूक विकासच्या डोक्याला लागून तो गंभीर जखमी झाला. रामराज यांनी त्याला तातडीने उपचारांसाठी शताब्दी रुग्णालयात नेले; पण तेथे उपचारांदरम्यान विकासचा मृत्यू झाला. याप्रकरणी देवनार पोलिसांनी टोईंग व्हॅनचालकाविरोधात गुन्हा नोंदवला. दुसऱ्या घटनेत, विलेपार्ले परिसरात राहणारा सुभाष डुलगच हा एका हाउस किपिंग कंपनीत व्यवस्थापक पदावर नोकरी करीत होता. शनिवारी (ता. ३१) दुपारी पावणेएकच्या सुमारास सुभाष हा कंपनीच्या कामानिमित्त घाटकोपर-मानखुर्द लिंकवरून दुचाकीने जात असताना भरधाव डम्परने त्याच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये जखमी झालेल्या सुभाषला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अपघातानंतर डम्परचालक गोविंदा चव्हाण (३५)विरोधात गुन्हा नोंदविला आहे.