-rat२p१७.jpg-
P25N67709
रत्नागिरी ः पाच वर्षानंतर लाटांच्या तडाख्याने तुटलेले बसरा स्टार जहाज.
----
‘बसरा स्टार’चे अखेर दोन तुकडे
पाच वर्षे किनाऱ्यावर अडकले; लाटांचा तडाख्याने नुकसान
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ : निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडून भरकटत मिऱ्या किनाऱ्यावर अडकून पडलेल्या बसरा स्टार जहाजाचे समुद्राच्या लाटांच्या तडाख्यात दोन तुकडे झाले. मंगळवारी (ता. ३) जहाज अडकून पाच वर्षे पूर्ण होणार आहेत. त्याच्या पूर्वसंध्येलाच या जहाजाचे दोन तुकडे झाल्यामुळे सेल्फी पॉईंट, रिल्स् पॉईंटसाठी पर्यटकांच्या आनंदाला आता ओहटी लागणार की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
किनारा सुरक्षिततेच्यादृष्टीने जहाज काढण्यासाठी शासकीय यंत्रणेने केलेले प्रयत्न तोकडे पडले होते. ३५ कोटींचे हे महाकाय जहाज समुद्राच्या खाऱ्या पाण्याने आणि लाटांच्या माऱ्याने सडले होते. अवघ्या दोन कोटींमध्ये ते भंगारात काढले जाणार आहे; बसरा स्टार जहाज ३ जून २०२० ला निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडले. वादळाचा धोका वाढल्याने सुरक्षेसाठी हे जहाज समुद्रात नांगरून ठेवण्यात आले होते; मात्र अजस्र लाटांच्या तडाख्यात नांगर तुटून हे जहाज भरकटत मिऱ्या समुद्रकिनारी लागले. हे जहाज काढण्यासाठी आता एम. एम. शिपिंग कॉर्पोरेशन कंपनी कस्टम आणि मेरिटाईम बोर्डाच्या कन्सल्टंट म्हणून काम करत आहे. दुबई येथील जहाज मालकाशी संपर्क झाला असून, त्याला ४० लाखांची कस्टम ड्युटी भरल्यानंतर ते भंगारात काढण्याबाबतची प्रक्रिया सुरू होणार आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये हे जहाज सडले आहे. त्याला भंगारात काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान सडलेल्या या जहाजाचे दोनदिवसांच्या उधाणच्या लाटांमुळे दोन तुकडे झाले आहेत.
---
स्थानिकांनी सुरू केले व्यवसाय
अडकलेल्या बसरा स्टार जहाजाचा आता पर्यटकांनी चांगला फायदा करून घेतला आहे. समाजमाध्यमांवर या जहाजासमोर अनेक रिल्स् तयार होऊन व्हायरल होत आहेत. तरुण, तरुणी, अन्य पर्यटक या सेल्फी पॉइंट म्हणून याकडे पाहत आहेत. त्याचा फायदा आता स्थानिक रहिवाशांनी घेऊन व्यवसाय सुरू केले आहेत. तिथे त्यांना नाष्टा, व्हेज, नॉनव्हेज जेवण दिले जाते. विशेष म्हणजे समोरच किनाऱ्यावर मचाण केले आहे. पर्यटक मचाणावर बसून आनंद घेतात.