Indigo Bird Hit : झारखंडची राजधानी रांचीला निघालेलं एक इंडिगोच्या विमानाला सोमवारी आपत्कालिन लँडिंग करावं लागलं. हवेत असतानाच या विमानाला पक्षानं धडक दिल्यामुळं मोठा अपघात होता होता वाचला. त्यामुळं या विमानातून प्रवास करणारे १७५ प्रवाशी बचावले आहेत. यामध्ये विमानाचं नुकसान झाल्याची माहिती मिळते आहे.
नेमकं काय घडलं?बिरसा मुंडा विमानतळाचे संचालक आर. आर. मौर्य यांनी सांगितलं की, ही घटना दुपारी सव्वा एक वाजता घडली. विमान एअरपोर्टपासून १० ते १२ समुद्री मैलाच्या अंतरावर आणि ३ ते ४ हजार फूट उंचीवर होतं. त्याचवेळी विमान हवेत उडत असलेल्या एका गिधाडाशी धडकलं. यानंतर तात्काळ पायलटनं सतर्कता दाखवत आपत्कालीन लँडिंग केलं. अशा प्रकारे आकाशात जेव्हा एखादा पक्षी विमानाला धडकतो तेव्हा त्याला बर्ड हिट असं म्हणतात.
दरम्यान, हे विमान एअरबस ३२० बनावटीचं असून त्यानं पाटण्याहून रांचीच्या दिशेनं उड्डाण केलं होतं. त्यानंतर ते कोलकात्याला जाणार होतं. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, गिधाड्यासारख्या मोठ्या पक्षाची धडक झाल्यानं विमानाचं नुकसान झालं आहे. विमानाची तपासणी करण्यासाठी इंजिनिअर्सची टीम पोहोचली असून नुकसानीचं आकलनं केलं जात आहे.
आपत्कालिन लँडिंगनंतर सर्व प्रवाशी सुरक्षितया घटनेनंतर विमानतळावर काही काळासाठी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली. पण इंडिगोच्यावतीनं या दुर्घटनेवर अद्याप कुठलंही अधिकृत भाष्य करण्यात आलेलं नाही. सध्या विमान ग्राऊंड करण्यात आलं असून सर्व प्रवाशांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलं आहे.
यापूर्वी रविवारी दिल्लीला निघालेल्या इंडिगोच्या एका फ्लाईटनं दिल्लीत खराब हवामानामुळं मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला होता. रायपूरहून दिल्लीला येणारं विमान धूळ आणि वादळामुळं काहीकाळ हवेत चक्कर मारल्यानंतर सुरक्षितरित्या दिल्ली विमानतळावर उतरलं होतं.