Kolhapur: काेल्हापूर जिल्ह्यातील १०७० जण क्षयरोगमुक्त; ३५९ ग्रामपंचायती प्रमाणपत्रासाठी पात्र; ५० रौप्यपदक, ३०९ कास्यपदके
esakal June 03, 2025 02:45 AM

सुनील पाटील

काेल्हापूर : जिल्हा क्षयमुक्त करण्यासाठी आरोग्य विभागाकडून चांगले प्रयत्न केले जात आहेत. राज्यात कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक ३५९ ग्रामपंचायती क्षयरोगमुक्त झाल्या आहेत. यात ५० ग्रामपंचायतींना रौप्यपदक तर ३०९ ग्रामपंचायतींना कांस्यपदक प्रमाणपत्र मिळाले आहे. भविष्यात जिल्ह्यातील ग्रामपंचायती सुवर्णपदक प्रमाणपत्रासाठी पात्र करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग पुढाकार घेतला आहे. दरम्यान, जिल्ह्यात असणाऱ्या १०७० रुग्णांना क्षयरोगमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

क्षयरोग ही देशासमोरील मोठी समस्या आहे. तरुणांत क्षयरोग होण्याचे प्रमाण जास्त आहे. देश क्षयमुक्त होण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून विविध मोहिम राबवल्या जातात. जिल्ह्यात ही मोहिम अधिक सक्षमपणे राबवली जात आहे. क्षयरोगाच्या उपचार कालावधीत औषधांबरोबरच योग्य पोषण आहार मिळाल्यामुळे रुग्ण औषधेमध्येच सोडत नाही व नियमित विनाखंड औषधोपचार घेतात. यामुळे रुग्ण वेळेत पूर्ण बरा होतो व रुग्णास पुढील टप्प्यातील क्षयरोग होत नाही. यासाठी क्षयरुग्णांना जास्तीतजास्त सकस आहार घेण्याची आवश्यकता आहे.

७०० रुग्णांना दत्तक घ्यावे :
दानशूर व्यक्ती संस्था, अधिकारी व कर्मचारी यांनी ‘निक्षय मित्र’ होऊन क्षयरुग्णांना दरमहा १ याप्रमाणे पुढील ६ महिन्यांसाठी पोषण आहार किटचे साहाय्य करण्यासाठी क्षयरुग्णांना दत्तक घ्यावे. जिल्हा परिषद सध्या ७०० रुग्ण दत्तक घ्यावयाचे बाकी आहेत. क्षयरोगमुक्तीसाठी प्रत्येक रुग्णांवर लक्ष केंद्रित करून त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना उपचाराच्या प्रक्रियेत आणण्यात यशस्वी झाले आहेत. ही प्रक्रिया अशाच पद्धतीने पुढे चालू राहील. क्षयरोग मुक्तीसाठी आरोग्य विभागाला नगरपंचायत, नगरपालिका, ग्रामपंचायतींचे सहकार्य करण्यासाठी दानशूर लोकांनी क्षयरोग्यांना दत्तक घेऊन उपचार करावेत, असे आवाहन आरोग्य विभागाकडून केले आहे.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत ‘निक्षय मित्र' होऊन क्षयरुग्णांना पोषण आहारासाठी सहाय्य करण्याबाबत आवाहन केले आहे, या आवाहनानुसार दानशूर व्यक्ती, संस्था यांनी पुढे येऊन टी. बी. पेशट दत्तक घ्यावेत.
डॉ. हर्षला वेदक, जिल्हा क्षयरोग अधिकारी, कोल्हापूर

जिल्ह्यातील क्षयरोगाचे (डीबी) तालुकानिहाय रुग्ण :
तालुका* १ जानेवारी २०२५ ते २७ मे २०२५ मधील रुग्ण
कागल* ४७
शाहूवाडी*३५
हातकणंगले*८२
शिरोळ* १२३
करवीर* १९२
गगनबावडा* ११
गडहिंग्लज* १०९
राधानगरी*४३
चंदगड* ३२
इचलकरंजी* २१८
आजरा* ३४
गारगोटी* ७५
पन्हाळा* ६९
एकूण* १०७०

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.