लग्नातील खर्चासंदर्भात बाळासाहेब थोरात यांचं बहुजन समाजाला आवाहन, म्हणाले, काळाच्या ओघात बदल…
Marathi June 03, 2025 03:28 AM

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत विविध मुद्यांवर भाष्य केलं. बाळासाहेब थोरात यांनी पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर अहिल्यानगर येथील मराठा समाजानं लग्नासंदर्भातील आचारसंहिता तयार केल्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर भाष्य करताना सध्याच्या लग्नातील वाढता खर्च कसा कमी ठेवता येईल यासंदर्भात विचार करण्याची गरज असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी नमूद केलं.

काळाच्या ओघात बदल केले पाहिजेत

अहिल्यानगरमध्ये प्रमुख मंडळी, संत मंडळी यांनी एकत्र येत निर्णय घेतला. काही गोष्टी ज्या असतात, अलीकडच्या काळात लग्नावर प्रचंड खर्च चालला आहे. मी निव्वळ मराठा समाज म्हणत नाही, सगळ्या समजानं विशेषत: बहुजन समाजानं लक्षात घेतलं पाहिजे. व्यापारी माणूस 50 माणसांचं वऱ्हाड नेतो,आमचं 5 हजारांचं असतं. आम्ही कर्ज काढून सोहळे करतो, ही वस्तूस्थिती आहे. खरं सांगतो तुम्हाला, निव्वळ मराठा समाज असं नाही, बहुजन समाजानं याच्याबाबत गंभीर झालं पाहिजे. काही बदल आपल्या जीवनात काळाच्या ओघात केले पाहिजेत, अहिल्यानगरमध्ये अत्यंत चांगले निर्णय घेण्यात आले आहेत. माझं त्या निर्णयांना समर्थन आहे.सगळ्या समाजाकरता झालं पाहिजे, अशी अपेक्षा माझी आहे, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

ती गोष्ट लाजीरवाणी

बीडमधील तब्बल 843 महिलांनी ऊसतोडणीला जाण्यापूर्वी गर्भपिशवी काढल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या संदर्भात विचारलं असता बाळासाहेब थोरात यांनी महिलांना त्रास आहे  ही वस्तूस्थिती आहे. गरोदर असताना महिलांना ऊस तोडावा लागत असेल, त्यांना जर गर्भाशयाची पिशवी काढून ठेवावी लागत असेल तर आपल्या सर्वांसाठी लाजीरवाणी गोष्ट आहे, असं बाळासाहेब थोरात म्हणाले. महाविकास आघाडी म्हणून काही निर्णय घेतले होते, नंतरच्या काळात त्याची अंमलबजावणी काय झाली हे समजायला तयार नाही. त्याबाबत योजना केली पाहिजे की, गरोदर महिलेनं ऊस तोडीला जावं ही अपेक्षा केली नाही पाहिजे.गर्भाशयाची पिशवी काढायची वेळ आली नाही पाहिजे. ही जबाबदारी त्या कुटुंबाची असली तरी शासनाची आणि समाजाची आहे, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट एक करार करत आहेत. एआय संदर्भातील तंत्रज्ञान आलं आहे,त्याद्वारे उसाचं उत्पादन वाढवू शकतो. खूप चांगलं तंत्रज्ञान आहे. त्यासंदर्भातील करार करायचे आहेत. मी बैठकीत होतो, वेगळी भेट घेतली नाही,असं बाळासाहेब थोरात म्हणाले. सगळे जण तुमच्यासमोर कायम असतात त्यांना विचारा, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

भाजपकडून मुंबईतील राणीच्या बागेतील पेंग्विनची नावं मराठीत असावी यासाठी आंदोलन करण्यात आलं आहे. यासंदर्भात विचारलं असता बाळासाहेब थोरात यांनी आपल्या देशापुढं, लोकांपुढं फार मोठे प्रश्न आहेत, असं म्हटलं. रोजगाराचं काय करणार, महागाई प्रचंड वाढलेली आहे.1 लाख रुपये तोळा सोनं झालं आहे. अर्थव्यवस्था खाली चालली आहे. चौथ्या स्थानावर गेलो असं म्हणतात ते खरं नाही जपानचं दरडोई आणि आपलं दरडोई उत्पन्न किती आहे, असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी केला. शेतीचे प्रश्न आहेत, रोजगाराचे प्रश्न आहेत, शहराचे प्रश्न आहेत, पाणी तुंबतंय, असं थोरात यांनी म्हटलं.

हेदेखील वाचा

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.