शेगाव - आषाढी वारीनिमित्त शेगाव येथून श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे सोमवारी सकाळी सात वाजता मंदिरामधून प्रस्थान झाले. सुमारे ७०० वारकऱ्यांच्या सहभागाने राजवैभवी थाटात वारी निघाली.
मंदिरामध्ये सेवाधारी व्यवस्थापकीय विश्वस्तांच्या हस्ते पालखीत सहभागी विणेकरी तसेच ‘श्रीं’च्या रौप्य मुखवट्याचे पूजन करण्यात आले. त्यानंतर टाळ मृदंगाच्या गजरात भजनी दिंडीने हा पालखी सोहळा वाजत गाजत मंदिर परिसरातून पालखी मार्गाने पुढे रवाना झाला. यावेळी शेकडो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. तसेच असंख्य भक्तांनी पालखीचे मागे नागझरी, पारसपर्यंत पायी चालत वारी केली.
पालखी नागझरी पारस निमकर्दा मार्गे पुढे अकोला, वाडेगाव, पातूर, डव्हा, रिसोड, परमणी, परळी वैजनाथ,उस्मानाबाद, तुळजापूर, सोलापूर या मार्गाने ३३ दिवस एकूण ७५० किलोमीटर पायदळ प्रवास करत ४ जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे मुक्कामास पोहचेल. तेथे आषाढी एकादशीनिमित्ताने पाच दिवस पालखीचा मुक्काम राहील. काल्यानंतर दहा जुलै रोजी सकाळी श्रींची पालखी शेगावकडे परतीच्या मार्गावर निघणार आहे.
यंदा पालखीचे ५६ वे वर्ष
श्रींच्या पंढरपूर पालखी पायदळ वारीचे यंदा ५६ वे वर्ष आहे. श्री गजानन महाराज संस्थानने अखंडितपणे पायदळ वारीची परंपरा कायम ठेवली आहे. या पालखी सोबत दरवर्षी शेकडो वारकरी भाविक पंढरपूरची वारी करत असतात. वारीमध्ये सहभागी सर्व वारकरी भक्त यांची सर्वतोपरी व्यवस्था संस्थानकडून करण्यात येते.
आकर्षक रांगोळ्यांनी स्वागत
पालखीचे प्रस्थानवेळी पालखी मार्गावर विविध रंगबेरंगी आकर्षक रांगोळी ठिकठिकाणी काढल्या होत्या. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी असंख्य भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. या सोहळ्याला विदर्भ, मराठवाडा, खानदेशातील हजारो भाविक उपस्थित होते.