Thane Crime: केबल जोडण्यासाठी गेले पण लोकं चोर समजून बसले, मेहुण्यांसह दाजीला धु-धु धुतले!
esakal June 03, 2025 05:45 AM

भिवंडी (वार्ताहर) : तुटलेल्या इंटरनेटची केबल जोडण्यासाठी गेलेल्या दोघांना चोर समजून शिवीगाळ व मारहाण झाल्याची घटना सोनारपाड्यात रविवारी (ता. १) रात्रीच्या सुमारास घडली आहे. इतकेच नव्हे तर या घटनेत चोर समजून मेहुण्यांसह भावोजीला मारल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी पाच जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर डांगे, चेतन डांगे, रोहित मिटका, आकाश मिटका, वैभव वंडरे, अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. तर संदीप गंगाराम आहेप व त्यांचे मेहुणे निखिल आणि सुरेश, तसेच निखिलचा एक कामगार साथीदार असे जखमी झाले आहेत.

नेमके काय घडले?

रविवारी सोनारपाडा येथील शिवमंदिराजवळील मल्लेशम इमारतीच्या बाजूला इंटरनेटची केबल तुटल्याने वायर जोडण्यासाठी संदीप यांचा मेहुणा निखिल व त्यांचा एक कामगार गेले होते. त्यावेळी किशोरने दोघांना चोर समजून शिवीगाळ करीत मारहाण केली.

त्यावेळी याचा जाब संदीप व दुसरा मेहुणा सुरेशने किशोरला विचारताच त्याने अन्य चार आरोपींच्या संगनमताने संदीप आणि सुरेशला लाथाबुक्क्यांसह लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात दाखल केला आहे.

अल्पवयीन मुलांचे भिवंडीतून अपहरण

भिवंडी शहरात अल्पवयीन मुला-मुलींच्या अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ झाली असताना आणखी दोघांचे अपहरण झाले आहे. धामणकर नाका परिसरातील माधव नगरातून शनिवारी (ता. ३१) दुपारी १ वाजता किराणा सामान आणण्यासाठी गेलेली आरीश मो. आलम शेख (१२ वर्षे ३ महिने) रात्री उशिरापर्यंत घरी परतली नसल्याने तिचे अपहरण झाल्याची तक्रार भोईवाडा पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे.

तर दुसऱ्या घटनेत अब्दुल रहीम अब्दुल हमीद अन्सारी (१५ वर्ष, १ महिना) शांतिनगर परिसरातील खान कंपाउंडमधून खेळण्यासाठी बाहेर गेला होता, परंतु आजतागायत घरी परतला नसल्याने त्याचे वडील अब्दूल हमीद अब्दुल रज्जाक अन्सारी यांनी शांतिनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.