(Thackeray Vs BJP) मुंबई : भाजपाकडे स्वतःचे असे काही उरले आहे काय? भाजपा मंत्री गिरीश महाजन हे इतर पक्ष संपविण्याची भाषा करीत आहेत, पण त्यांचा भारतीय जनता पक्ष शिल्लक राहिला आहे काय, याचा त्यांनी आधी शोध घ्यावा. कारण आजचा भाजपा हा मूळ भाजपा नसून इतर पक्षांतून आणलेल्या बेइमान, भ्रष्ट लोकांच्या घुसखोरीने तरारलेला पक्ष बनला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खासदार प्रफुल्ल पटेलसारखे (इक्बाल मिर्ची फेम) लोक भाजपाचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर बनले आहेत. त्यामुळे शिवसेना जमीनदोस्त करण्यासाठी भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांना पवित्र हात लाभणार नाहीत. मुळात तुमचे शंभर बाप आले तरी ते शक्य होणार नाही, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी खडसावले आहे. (Uddhav Thackeray targets BJP over leaders from other parties)
भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांच्या इतर कर्तबगारीविषयी अनेक रकाने भरता येतील, पण काळाने ती जबाबदारी त्यांचे एकेकाळचे गुरू महाराज एकनाथ खडसे यांच्यावर सोपवली आहे. गिरीश महाजन यांनी त्यांना हवे ते करावे. यांचे-त्यांचे पक्ष फोडावेत. निदान तशा वल्गना कराव्यात, पण भारतीय लोकशाही ही प्रामाणिक जनतेच्या करंगळीवर गोवर्धन पर्वतासारखी तरली आहे हे ध्यानात ठेवावे, असे उद्धव ठाकरे यांनी गिरीश महाजन यांना सुनावले आहे.
हेही वाचा – Thackeray Vs Mahajan : फडणवीसांच्या मागेपुढे ठुमके देत नाचण्याशिवाय… ठाकरेंची महाजनांवर जहरी टीका
बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यवान हातांनी आणि विचारांनी शिवसेना स्थापन झाली. मराठी माणसांच्या स्वाभिमानातून हा अंगार उसळला, हिंदुत्वाची ज्वलंत भूमिका आणि आंदोलनातून शिवसेनेचे तेज उसळले. ते कसे विझेल? काही विकाऊ लोक महाजन यांच्यासारख्या नाच्यांबरोबर ‘ठुमके’ मारू लागले म्हणजे शिवसेना जमीनदोस्त झाली असे होत नाही. शिवसेना जमीनदोस्त करण्याचे स्वप्न घेऊन नाचणारे अनेक नाचे याच जमिनीत गाडले गेले हा इतिहास आहे. महाजन, तुम्हीही त्याच मार्गाने निघाला आहात. हा महाराष्ट्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नीच राजकारणाला शरण जाणार नाही, असे ठाकरे यांनी सामना दैनिकातील अग्रलेखात म्हटले आहे.
हेही वाचा – Thackeray on Mahajan : गुंडांचे सूत्रधार महाजनांवर फडणवीसांनी कारवाई करावी, ठाकरेंची मागणी