हिमस्खलनात तीन सैनिक मरतात
Marathi June 03, 2025 11:25 AM

सिक्कीममधील घटनेत सहा सैनिक अद्याप बेपत्ता, उशिरापर्यंत शोधकार्य

सर्कल / गँगटोक

भारताच्या सेनेचे तीन सैनिकांचा सिक्कीममधील हिमस्खलनात मृत्यू झाला आहे. तर सहा सैनिक बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्यासाठी व्यापक अभियान हाती घेण्यात आले आहे. या हिमस्खलनामुळे 1 हजारांहून अधिक गिर्यारोहकही अडकले असून त्यांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी नैसर्गिक आपत्ती निवारण दलाने कंबर कसली आहे. रात्री उशीरापर्यंत त्यांची सुटका करण्याचा प्रयत्न केला जात होता.

सिक्कीम राज्याच्या लाचेन आणि लाचुंग या प्रदेशांच्या मधल्या भागात हे हिमस्खलन सोमवारीं सकाळी झाले. त्यामुळे तीस्ता नदीवरचा एक लहान सेतू कोसळला. गेले दोन दिवस या भागात प्रचंड पाऊस होत आहे. त्यामुळे हिमस्खलन आणि त्याच्यासह भूस्खलनही झाले आहे. मुसळधार पावसामुळे तीस्ता नदीला पूर आला आहे. पुरामुळे पर्यटकांची सुटका करण्यात अडथळे येत आहेत.

सैनिकांच्या सुटकेचे प्रयत्न

हिमस्खलन आणि भूस्खलन यांच्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्या तीन सैनिकांचे मृतदेह सापडले आहेत. तथापि, अद्यापही सहा सैनिक त्यांच्या छावणीत परतलेले नाहीत. ते हिमस्खलनात अडकले असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. वनसंरक्षक दलाचे सैनिक, स्थानिक पोलीस आणि इतर अर्धसैनिक दलांचे साहाय्यही घेण्यात येत असून सैनिकांना शोधण्यात यश येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

आपत्कालीन सेवक पक्ष नियुक्त

सिक्कीम सरकार आणि भारत सरकारने त्वरीत आपल्या आपत्कालीन साहाय्यता दलांना कार्यरत केले आहे. या दलांचे सुरक्षा सैनिक पर्यटकांपर्यंत पोहचले असून हेलिकॉप्टरच्या साहाय्याने त्यांची सुटका करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. रात्री उशीरापर्यंत साधारणत: 200 पर्यटकांची सुटका करण्यात आली. पिडांग सेतूची हानी या हिमस्खलनात झाली असून त्यामुळे वाहनवाहतुकीला अडथळा येत आहे. या सेतूची डागडुजी करण्याचे कामही हाती घेतले गेले आहे.

जीवरक्षक नौकांचा उपयोग

पर्यटकांची सुटका करण्यासाठी जीवरक्षक नौकांचा उपयोग करण्यात येत आहे. तीस्ता नदीला पूर आलेला असला तरी हे अभियान पार पाडले जात आहे. अडकलेल्या पर्यटकांच्या आहाराची व्यवस्थाही प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असून पर्यटक सुस्थितीत असल्याचे सिक्कीम प्रशासनाने स्पष्ट केले.

कमी दाबाच्या पट्ट्याची निर्मिती

गुरुवारपासूनच सिक्कीम आणि इतर ईशान्य भारतातील इतर राज्यांवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे पाऊस कोसळत आहे. ईशान्य भारतातील सर्व नद्यांना पूर आला असून सर्व राज्यांना सज्ज अवस्थेत राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. साधारणत: 12 तास हा कमी दाबाचा पट्टा टिकून राहिला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पावसाचे आगमन झाले आहे. नागरीकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या असून भूख्सलनामुळे दक्षिण सिक्कीमधील काही घरांची हानीं झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.