आयपीएल 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पंजाब किंग्सचा 6 धावांनी धुव्वा उडवला. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 गडी गमवून 190 धावा केल्या आणि विजयासाठी 191 धावांचं आव्हान दिलं. पण हे आव्हान काही पंजाब किंग्सला पूर्ण करता आलं नाही. पंजाब किंग्सने 20 षटकात 7 गडी गमवून 184 धावा केल्या आणि सहा धावांनी पराभव झाला. आरसीबीने 17 वर्षानंतर जेतेपदापवर नाव कोरलं. पंजाब किंग्सच्या हातात हा सामना होता. पण हा सामना शेवटच्या टप्प्यात वाळूसारखा हातातून निसटत गेला. शशांक सिंहने शेवटच्या षटकात जोरदार फटकेबाजी करत विजयाचं अंतर कमी केलं. पण विजय काही मिळवून देऊ शकला नाही. त्यामुळे पंजाब किंग्सला जेतेपदासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात 11 वर्षांनी पंजाबने अंतिम फेरी गाठली होती. अंतिम सामन्यात पराभव झाल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने मन मोकळं केलं. तसेच सामना कुठे गमावला त्याचं विश्लेषण केलं.
श्रेयस अय्यरने सांगितलं की, ‘खरे सांगायचे तर निराशा झाली पण आमची मुले ज्या पद्धतीने या संधीचा सामना करायला आली, ती तशी नव्हती पण त्याचे बरेच श्रेय सपोर्ट स्टाफ, मालक आणि यात सहभागी झालेल्या प्रत्येकाला जाते. शेवटच्या सामन्याचा विचार करता, मला वैयक्तिकरित्या असे वाटले की 200 धावा हा एक चांगला स्कोअर होता. त्यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली, विशेषतः कृणाल, त्याच्याकडे भरपूर अनुभव आहे. मला वाटते की हाच टर्निंग पॉइंट होता. या संघात सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीचा मला खूप अभिमान आहे. असे बरेच तरुण आहेत जे त्यांचा पहिला हंगाम खेळत आहेत, त्यांनी खूप निर्भयता दाखवली आहे. त्यांच्याशिवाय आपण येथे असू शकत नाही, त्यांना सलाम.’
श्रेयस अय्यरने या सामन्यातील पराभवाच दु:ख विसरून पुढच्या हंगामाची तयारी सुरु करण्याच्या सहकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. या हंगामात जेतेपदाचं स्वप्न काही पूर्ण झालं नाही. पण नक्कीच पुढे होईल असा विश्वास त्याने यावेळी व्यक्त केला. ‘आपल्याला येथे राहून पुढच्या वर्षी ट्रॉफी जिंकावी लागेल. ज्या पद्धतीने आपण प्रत्येकाला सामोरे गेलो आणि हा सामना जिंकू शकतो या विश्वासाने. आशा आहे की आपण पुढच्या हंगामात येथे राहू शकू आणि काही चांगले क्रिकेट खेळू शकू.’, असं श्रेयस अय्यर म्हणाला.