मुंबई : एसटीच्या सुमारे ९० हजार कर्मचाऱ्यांना १ जूनपासून राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्के महागाई भत्ता दिला जाणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ते सह्याद्री अतिथिगृहावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बोलावलेल्या सर्व एसटी कर्मचारी संघटनांच्या कृती समितीसमोर बोलत होते. एसटी महामंडळावर त्याचा दरमहा १९ कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.
म्हणाले, ‘माझ्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीमध्ये परिवहन खाते माझ्याकडे होते. त्यावेळी एसटीच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये साडेसहा हजार रुपये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचा लाभ एक लाख एसटी कर्मचाऱ्यांना झाला आहे. त्याचे समाधान निश्चितच आहे.
परंतु त्याबरोबरच महिलांना तिकीट दर ५० टक्के सवलत व ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत एसटी प्रवास या शासनाने दिलेल्या सवलतीमुळे एसटीच्या प्रवासीसंख्येत भरघोस वाढ झाली. त्यामुळे एसटीचे एकूण अर्थकारण बदलून ती नफ्याच्या दिशेने प्रवास करू लागली. हा खूप मोठा बदल आपल्या काळात घडून आला.
परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणाले की, राज्य शासनाची महात्मा फुले जन आरोग्य योजना व केंद्र शासनाची आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना त्यांचे एकत्रीकरण करून त्याचा ५ लाख रुपयांपर्यंतचा कॅशलेस लाभ सर्व एसटी कर्मचाऱ्यांना देण्यात येईल.
तसेच धर्मवीर आनंद दिघे आरोग्य योजनेंतर्गत शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे ९० टक्के वैद्यकीय चाचण्या व खर्चाची प्रतिपूर्ती रक्कम देण्याची योजनासुद्धा कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. यापैकी एका योजनेचा लाभ ते कर्मचारी घेऊ शकतात.
या बैठकीला माजी खासदार आनंदराव अडसूळ, आमदार सदाभाऊ खोत, अतिरिक्त मुख्य सचिव (परिवहन) संजय सेठी, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष डॉ. माधव कुसेकर यांच्यासह सर्व कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
एक कोटींचे विमाकवचस्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे अपघाती निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपये देण्याची विमायोजना लागू करण्यात येत असून त्याबाबतचा सामंजस्य करार एसटी महामंडळ व स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्यादरम्यान करण्यात आला आहे, अशी माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली. या योजनेअंतर्गत पूर्णतः अपंगत्व आलेल्या कर्मचाऱ्यांना एक कोटी रुपयापर्यंत, तर अंशतः अपंगत्व आलेल्या एसटी कर्मचाऱ्याला ८० लाख रुपयापर्यंत मदत मिळणार आहे.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी पासएसटीच्या सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना व त्यांच्या पत्नीला वर्षभर एसटीतून मोफत प्रवास करण्याचा पास देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वेळी केली. उर्वरित मागण्यासंदर्भात लवकरच बैठक घेऊन त्यादेखील पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन मंत्री सरनाईक यांनी यावेळी दिले.