Thane News: ठाणेकरांची वाहतूक कोंडी! रस्त्यावरच थाटला आठवडा बाजार, प्रवासी त्रस्त; ट्रॅफिकची समस्या सुटणार कधी?
esakal June 04, 2025 11:45 PM

टोकावडे (बातमीदार) : माळशेज-मुरबाड राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्यावरील सरळगाव बाजारपेठेत मंगळवारी भरणारा आठवडा बाजार सध्या वाहतूक कोंडीला निमित्त ठरत आहे. या बाजारातील विक्रेत्यांकडून रस्त्यावर दुकाने थाटण्यात आल्याने चक्का जाम होत आहे.

सरळगावातील गुरांचा, भाजीपाला, कपडा व संसारोपयोगी वस्तूंचा आठवडा बाजार भरत असतो. या बाजारात जुन्नर, ओतूर, आळेफाटा, नारायणगाव येथून व्यापारी येत असतात. आजूबाजूच्या शेतकऱ्यांना व भाजीविक्रेत्यांना आपला शेतीमाल विकण्यासाठी सोयीची बाजारपेठ असल्याने लाखोंचा खर्च करून मार्केट यार्ड बांधलेले आहे. तरीही ग्रामपंचायतीच्या नियमांना हरताळ फासत विक्रेते थेट रस्त्यावरच दुकाने थाटत असल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळे रहदारीच्या वेळेतच वाहतूक होत प्रवासी हैराण झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, सरळगावातील आठवडा बाजारात शहापूर, मुरबाड तालुक्यातील साठ ते सत्तर गावांच्या ग्राहकांची गर्दी होत असते. सणासुदीच्या दिवशी येथे मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते, पण रस्त्याच्या कडेलाच दुकाने, मालाचे टेम्पो, वाहने उभी केली जात असल्याने रस्त्यावरून चालणे अशक्य झाल्याने प्रवाशांचा वेळेचा खोळंबा होतो.

वाहतूक कोंडीचा प्रवाशांना मनस्ताप

सरळगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मुरबाड पोलिस ठाण्यात विनंती अर्ज केले आहेत. तसेच भाजीपाला विक्रीसाठी बांधलेल्या मार्केट यार्डमध्ये आठवडा बाजार भरवण्याची विनंती केली आहे, पण वारंवार सांगूनही ठोस निर्णय घेतला जात नसल्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळीच उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

सरळगावातील आठवडा बाजारात कोंडीमुळे वेळेचा खोळंबा होत आहे. हा बाजार निर्धारित जागेवर भरवण्याची गरज आहे. तसेच वाहनांची गर्दी पाहता अपघातांची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.

-दिलीप घुडे, ग्रामस्थ

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.