रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 18 व्या मोसमात पंजाब किंग्सवर 6 धावांनी मात करत आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं. आरसीबीने यासह 18 वर्षांची प्रतिक्षा संपवली. विराट कोहली याचं आणि असंख्य चाहचत्यांचं स्वप्न पूर्ण झालं. मात्र काही तासांनीच आरसीबीच्या आनंदावर विरजण पडलं. आरसीबीच्या ऐतिहासिक विजयाच्या 18 तासांनंतरच एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. मात्र स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत 11 चाहत्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे आनंदावर विरडण पडलं. या दुर्घटनेनंतर आता आरसीबीकडून अधिकृत निवदेन जारी करण्यात आलं आहे. आरसीबीने या निवेदनाद्वारे दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केलंय. तसेच चाहत्यांना आवाहन केलंय. या निवदेनात काय म्हटलं? जाणून घेऊयात.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने बुधवारी संध्याकाळी एक निवेदन जारी करून दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. तसेच मृतांच्या कुटुंबियांसाठी मनापासून संवेदना व्यक्त केल्या.
“आज दुपारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाच्या आगमनावेळी बंगळूरु शहरातील सार्वजनिक ठिकाणी काही घटना घडल्याची बातमी माध्यमांतून समोर आल्याने आम्हाला खूप दुःख झालंय. प्रत्येकाची सुरक्षितता आणि कल्याण आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे. या घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल आरसीबीला खूप खेद वाटतो. आम्ही बाधित कुटुंबांप्रति मनापासून संवेदना व्यक्त करतो”, असं म्हणत आरसीबीने मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केली.
चाहत्यांना सुरक्षित राहण्याचं फ्रँचायजीकडून आवाहन
“तसेच घडलेल्या दुर्घटनेची माहिती मिळताच आम्ही तात्काळ नियोजित कार्यक्रमात बदल केले. तसेच स्थानिक प्रशासनाच्या सूचना आणि सल्ल्याचे आम्ही पूर्णपणे पालन केले. तसेच कृपया सुरक्षित रहा” असं आवाहनही आरसीबीने चाहत्यांना केलं आहे.