मुंबई : महायुती सरकारची लाडकी बहीण ही योजना सातत्याने चर्चेचा विषय ठरते. गेल्या काही काळापासून या योजनेमुळे महायुतीवर अनेकदा टीका करण्यात आली आहे. याआधी विरोधकांनी या योजनेवरून महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. तर आता महायुतीला घरचा आहेर मिळाला आहे. कारण, महायुतीमधील घटकपक्ष असलेल्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी लाडकी बहीण योजनेवर टीका केली आहे. लोकांवर असा कोट्यवधींचा निधी उधळण्यापेक्षा ते पैसे गडकिल्ल्यांच्या संवर्धनावर खर्च करा असा सल्ला त्यांनी दिला. (Shivsena Sanjay Gaikwad criticized ladki bahin yojna fund demanded for forts)
“खऱ्या शिवभक्तांना शिस्त सांगण्याची गरज नाही. गड किल्ल्यांवर आपल्या प्रेमिकेचे नाव आणि इतर विटंबना करणाऱ्या तरुणांनी तसे करू नये. गडकिल्ल्यांचे पुनर्वैभव प्राप्त होणे गरजेचे आहे. कोट्यवधीच्या योजना लोकांवर उधळण्यापेक्षा तेच पैसे राजांच्या गडकिल्ला संवर्धनासाठी वापरा,” असा सल्ला देत शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी अप्रत्यक्षपणे लाडकी बहीण योजनेवर टीका केली. छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या लाखो करोडो महिलांची अब्रू कुंकू वाचवले त्या राजांचे किल्ले कधी तुम्ही सलामत ठेवणार? असा सवाल त्यांनी यावेळी केला.
“352 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या साक्षीदार होण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. शिवरायांची भक्ती आणि कीर्ती ही ओसांडून वाहत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती जगात पसरलेली आहे. रायरीचा डोंगर राजेंनी किल्ले रायगडसाठी निवडला. या ठिकाणी 350 इमारती असलेला किल्ला कमी कालावधीत उभारला गेला. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज यांना जर का दीर्घायुष्य लाभले असते तर देशात निजाम मुघल, पोर्तुगीज, कुतुबशाह हे कोणीच शिल्लक राहिले नसते. मराठ्यांनी पराक्रम करून संपूर्ण भारतभूमी 1750 पर्यंत मोघलरहीत केली.” असे ते पुढे म्हणाले.