Bachchu Kadu : कर्जमाफी, मानधनासाठी लढा! बच्चू कडू यांचे गुरुकुंजात अन्नत्याग आंदोलन
esakal June 07, 2025 04:45 PM

तिवसा : शेतकरी शेतमजूर व दिव्यांग, निराधार यांच्या प्रलंबित असलेल्या प्रश्नांकडे शासन लक्ष देत नसल्याचा आरोप करित प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार बच्चू कडू राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधी स्थळाचे दर्शन घेऊन ८ जूनपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन करणार आहेत.

आज राज्यातील लाखो शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जाला हमीभाव मिळत नसल्याने त्यांचे उत्पन्न शून्याच्या आसपास पोहोचले आहे. दिव्याग अपंग, निराधारांना आजही केवळ १५०० रुपये तटपुंज्या मानधनावर जगावे लागते.

कर्जमाफी व दिव्याग बांधवांना किमान सहा हजार रुपये मानधन मिळवून देण्यासाठी माजी आमदार बचू कडू यांच्या नेतृत्वात गुरुकुंज मोझरी येथे शेतकरी, दिव्यांग, निराधार वृद्ध व प्रहार पक्षातील शेकडो कार्यकर्त्यासमवेत बेमुदत अन्नत्याग आंदोलनास सुरवात करण्यात येणार आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, दिव्यांग व महिलांना किमान सहा हजार रुपये मानधन द्या, मनरेगा वरील मजुरी ५०० रुपये करा अश्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडू गुरुकुंजातील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या श्री गुरुदेव विद्यामंदिर शाळेच्या भव्य प्रांगणात अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. सरकार जोपर्यंत या प्रमुख मागण्यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका बच्चू कडू यांनी घेतली आहे.

अमरावतीतून बाईक रॅली

अमरावतीच्या संत गाडगेबाबा समाधी मंदिर ते गुरुकुंज मोझरी अशी १५ ते २० हजार शेतकरी व प्रहार कार्यकर्त्यांची बाईक रॅली काढून या आंदोलनाला सुरवात होणार आहे. मोझरी येथे सभा घेऊन सभेचे रूपांतर आंदोलनात करण्यात येईल. या आंदोलनात राज्यभऱ्यातून प्रहारचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत, अशी माहिती प्रहार संघटनेचे नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देशमुख यांनी दिली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.