वसंत जाधव, पनवेल
पनवेल परिसरातील पावसाळी पर्यटनस्थळे बंदीच्या चौकटीत अडकली आहेत. या ठिकाणी अनेकदा दुर्घटना होऊन जीवितहानी होत असल्याने पांडवकडा, गाढेश्वर, मोरबे आदी ठिकाणे धोकादायक ठरवून पर्यटकांसाठी बंदी घालण्यात आली आहे. संबंधित यंत्रणांकडून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड होत आहे. तसेच या परिसरातील स्थानिकांचा व्यवसाय बुडत आहे. त्यामुळे या नयनरम्य ठिकाणांचा मग फायदा काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या पनवेल परिसरात औद्योगिकीकरणाबरोबच नागरिकरणात झपाट्याने वाढ झाली आहे. मुंबई, नवी मुंबईनंतर पनवेल परिसराला राहण्याकरिता पसंती दिली जात आहे. या कारणाने येथील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सिमेंटची जंगले उभे राहत असताना येथील हिरवाई कमी झाली आहे. ही वस्तुस्थिती असली तरी अद्याप दुर्गम आणि डोंगराळ भाग पनवेल तालुक्यात अस्तित्वात आहे. या ठिकाणी वनराईही मोठ्या प्रमाणात आहे तसेच पावसाचे प्रमाणही जास्त आहे. खारघरच्या बाजूला पांडवकडा हा नैसर्गिक धबधबा आहे. येथील डोंगररांगांतून अतिशय वेगाने पाणी खाली पडते. हे दृश्य अतिशय मनमोहक असल्याने येथे पनवेल, नवी मुंबई आणि मुंबईहून पर्यटक गर्दी करतात. उंचीवरून खाली पडणारे फेसाळते पाणी अंगावर घेण्यासाठी सुट्टीच्या दिवशी येथे मोठी गर्दी असे. लोणावळा, खंडाळा, नाणे घाटाला पर्याय म्हणून पांडवकड्याकडे पाहिले जाते; परंतु वरील भागातून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचा वेग अचानक वाढतो. त्यामध्ये अनेक पर्यटक वाहून गेले आहेत. दिवसेंदिवस पर्यटकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याने येथे बंदी घालण्यात आली आहे. गाढेश्वर येथीलही परिस्थितीत वेगळी नाही. माथेरानच्या पायथ्याशी असलेले गाढेश्वर येथेही पर्यटकांची गर्दी असते. पाण्यात मनसोक्त भिजण्याची मजा लुटण्यासाठी कित्येक पर्यटक या ठिकाणी येण्यास उत्सुक असतात; परंतु अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने येथे मागील काही वर्षांत पर्यटकांचा जीव गेल्याची नोंद आहे. गाढेश्वर परिसरातही पर्यटकांना येण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर शिरवली परिसरात मोरबे धरण आहे. हा जलाशय डोंगराच्या सान्निध्यात आहे. या कारणाने पावसाळी सहलीसाठी येथे गर्दी पाहावयास मिळते. येथेही प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. या तीनही ठिकाणी पावसाळी पर्यटन बंद करण्यात आले आहे. निसर्गरम्य ठिकाणांच्या सान्निध्यात जाण्यास पर्यटकांना बंदी घालणे हा पर्याय होऊ शकत नाही. तसेच पर्यटनस्थळे बंद असल्याने पर्यटनावर अवलंबून असणारा व्यवसायही स्थानिकांना करता येत नाही. त्यामुळे येथील स्थानिकांचा व्यवसाय बुडत आहे. त्यासाठी सुरक्षिततेच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. असे मत निसर्गमित्र संघटनेचे धनंजय पाटील यांनी व्यक्त केले आहे. पर्यटनापेक्षा त्यांचा जीव महत्त्वाचा असल्याने बंदी घातल्याचे पनवेल तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन घाडगे यांनी सांगितले.
----------
सुरक्षेच्या उपाययोजना बस्तानात
पांडवकडा परिसरात बंदीऐवजी सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर प्रशासनाने भर द्यावा, अशी मागणी खारघर विकास समितीच्या वतीने भूषण म्हात्रे यांनी केली होती. तत्कालीन सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी याकामी पुढाकार घेतला होता. त्यानुसार पांडवकडा परिसरात धोकादायक ठिकाणी संरक्षण भिंत बांधण्यात येणार होती. तसेच इतरही उपाययोजना सिडकोच्या माध्यमातून केल्या जाणार होत्या. या कामाचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता; परंतु असे कुठलेही काम नंतर झाले नाही.
---------
इतरही पर्याय; पण महागडे
शहरी भागातील पर्यटकांना पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी वीकेंडचा पर्याय असतो; परंतु नजीकच्या सर्वच पर्यटनस्थळांवर बंदी आणल्याने पर्यटकांना लोणावळा, खंडाळा, नाने घाट, महाबळेश्वर, माथेरान इत्यादी ठिकाणी जावे लागते किंवा नजीकच्या फार्महाउस, रिसॉर्टचा पर्याय निवडावा लागतो. या सर्व बाबी खर्चीक असल्याने पर्यटकांच्या खिशाला कात्री लागते. त्यामुळेच कित्येक जणांचा पावसाळी सहलीचा बेत रद्द झाला आहे.
-----------
धावपळीच्या जीवनात विरंगुळा म्हणून पनवेल व नवी मुंबई
परिसरातील लोकांना जवळपासची पर्यटनस्थळे म्हणून पांडवकडा, गाढेश्वर आणि मोरबे ही ठिकाणे आहेत. या परिसरात बंदीऐवजी सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर प्रशासनाने भर द्यावा. पावसाळ्यात बंदी न घालता सुरक्षिततेच्या उपायांसह पर्यटन सुखकर व्हावे.
- ॲड. देवेंद्र बोडरे, पर्यावणप्रेमी
-------------
खारघर परिसर पनवेल पालिका क्षेत्रात असला तरी पांडवकडा हा वन विभागात असून, सिडकोच्या अखत्यारित आहे. पाण्याचा वेग व अंदाज न आल्याने या ठिकाणी अनेक वेळा पर्यटकांच्या जीविताला धोका पोहोचलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी जाणे धोकादायक आहे. पालिका, पोलिस प्रशासन आणि इतर संबंधित आस्थापनांशी समन्वय साधून या ठिकाणी बंदी घातली आहे.
- कैलास गावडे, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख, पनवेल महापालिका
------------------
पनवेल आणि परिसरात निसर्गाने मुक्तहस्ते सौंदर्याची उधळण केली आहे; परंतु बंदीमुळे या ठिकाणच्या निसर्गाचा आनंद पर्यटकांना लुटता येत नाही. ज्या ठिकाणी धोके आहेत त्या ठिकाणी प्रशासनाने बंदी घालावी; परंतु ज्या ठिकाणी धोके नाहीत अशा ठिकाणी उपाययोजना कराव्यात; जेणेकरून पर्यटकांचा हिरमोड होणार नाही.
- धनंजय पाटील, निसर्गमित्र, पनवेल
--------------------
पर्यटकांची हुल्लडबाजी व यापूर्वी या ठिकाणी झालेल्या दुर्घटना लक्षात घेता दरवर्षीप्रमाणे पनवेल तालुक्यातील गाढेश्वर, देहरंग, मोरबे धरणांसह इतर पावसाळी पर्यटनस्थळांवर पर्यटकांना प्रवेशबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांशिवाय कोणालाही या ठिकाणी सोडण्यात येत नाही.
- गजानन घाडगे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, तालुका पोलिस ठाणे