
>> निलया वैद्य
तोलहानपणापासून सर्वांपेक्षा वेगळा होता. त्याचं तत्वज्ञान आगळं होतं. तो अकरा वर्षांचा असताना त्याच्या वर्गातल्या काही मुलांना शाळा सोडावी लागली कारण त्यांच्या पालकांकडे फीसाठी दमडी नव्हती. ते पाहून त्याचा राग अनावर झाला. तो सत्तावीस वर्षांचा असताना त्याच्या नजरेत एक कफल्लक दांपत्य आलं. दोन पैसे मिळवण्यासाठी ते त्यांच्या तरुण मुलीला वेश्यागृहाला विकायला निघाले होते. ते पाहून त्याचा राग अनावर झाला. तो पन्नाशीत आला तेव्हा त्याने उकिरडय़ावर तान्हय़ा दोन जुळ्या मुलींना कोणीतरी टाकलेलं पाहिलं. ती अर्भकं पाहून त्याचा राग अनावर झाला.
‘सामान्य जनतेचा नोबेल मॅन – कैलाश सत्यार्थी’ हे पुस्तक वाचताना वरील प्रसंगांचा अनुभव घेताना वाचक कासावीस होतो. हे आणि असे कितीतरी प्रसंग कैलाश सत्यार्थी यांनी स्वतच्या डोळ्यांनी पहिले, अनुभवले त्यावेळी ते कमालीचे क्रोधित झाले. पण क्रोधित होऊन निराश झाले नाहीत तर क्रोधातून पेटून जाऊन त्यांनी कडव्या सामाजिक समस्या सोडवण्यासाठी तोडगे काढले. नवे प्रकल्प हाती घेतले. ते राबविले आणि जगाला दाखवून दिलं की क्रोध अच्छा है! रागाच्या भरात त्यांच्या डोक्यातून समाजप्रबोधनाच्या नावीन्यपूर्ण संकल्पनांचा जन्म झाला. हा राग, हा क्रोध तुमच्या आमच्यापासून बनलेल्या निर्विकार समाजाविरुद्ध आहे. अशा घटना आपल्या आजूबाजूला घडत असताना समाज षंढासारखा गप्प कसा बसू शकतो…?
लेखक शिवकुमार शर्मा यांनी आपल्या ‘सामान्य जनतेचा नोबेल
मॅन’ या पुस्तकात छोटय़ा छोटय़ा पण निराशाजनक गोष्टींवर सत्यार्थी यांनी कसा तोडगा काढला आणि त्यामुळे हजारो लहान मुलांचा, गरीब कुटुंबांचा कसा कायापालट केला याचं अचंबित करणारं वर्णन आहे. आपल्यापैकी काहींना प्रश्न पडेल की हे कैलाश सत्यार्थी आहेत तरी कोण? ते मध्य प्रदेशातल्या विदिशा जिह्यात जन्मलेले आणि दिल्लीत राहणारे ‘नोबेल पुरस्कार’ विजेते थोर समाजप्रबोधनकार आहेत. 2014 रोजी त्यांना नोबेल प्राप्त झालं तेव्हा ते रवींद्रनाथ टागोर, सी व्ही रमण, मदर तेरेसा… अशा काही मोजक्या भारतीय दिग्गजांच्या पंक्तीत समाविष्ट झाले. विशेष म्हणजे, त्यांनी निस्वार्थीपणे हा पुरस्कार आपल्या देशाला समर्पित केला. अशी निर्मळ व्यक्ती पुन्हा होणे नाही, असा आदरार्थी उल्लेख लेखक प्रस्तावनेत करतो आणि लिहितो की, सत्यार्थी एक आगळं वेगळं व्यक्तिमत्त्व आहे. ‘क्रोध अच्छा है’ हे त्यांचं तत्वज्ञान आहे. क्रोधाचं रूपांतर समाजप्रबोधनात करण्याची हातोटी त्यांच्याकडे आहे.
‘सामान्य जनतेचा नोबेल मॅन’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद हेमलता नेसरी यांनी केला आहे. शेवटच्या प्रकरणात सत्यार्थी यांनी नोबेल पुरस्कार स्वीकारताना मुद्रित केलेल्या भाषणाचा अनुवाद गौरी साळवेकर यांनी केला आहे. हे भाषण वाचताना सत्यार्थी यांचं व्यक्तिमत्त्व डोळ्यांपुढे उभं राहतं.