भाजपाचे नेते तथा आमदार नितेश राणे यांनी धाराशीवमध्ये केलेल्या विधानाचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटले आहेत. त्यांनी सर्वांचा बाप म्हणून राज्यात भाजपाचा मुख्यमंत्री बसलेला आहे. 2029 साली भाजपाचेच आमदार निवडून आले पाहिजेत, असं विधान भर सभेत केलं होतं. त्यांच्या या विधानाचा समाचार आता ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतला आहे. ओमराजे यांनी नितेश राणे यांना जशास तसे उत्तर दिले आहे.
महाराष्ट्रातील जनतेला लक्षात आले असेल की आपण टाकलेल्या मतांची सूज नितेश राणे यांना कशी आलेली आहे. सत्ता आली म्हणजे आपणच मालक झालो असं नसतं. मला वाटतं अशा पद्धतीचं जे वागणं आहे, त्याची सूज जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही, असा हल्लाबोल ओमराजे निंबाळकर यांनी केला.
नारायण राणे, नितेश राणे आणि निलेश राणे या तिघांपेक्षा जास्त मतानी मी निवडून आलो. लोकशाहीमध्ये जनता ही बाप असते. या तिघांच्या पडलेल्या मतांची बेरीज एक लाख 14 हजार 41 एवढी होते. तर धाराशिव लोकसभा मंतदारसंघातून मी तीन लाख 29 हजार 48 मतांनी निवडून आलो. महाराष्ट्रातील दोन नंबरचे मताधिक्य देऊन मला जनतेने संसदेत पाठवले, असा टोला ओमराजे निंबाळकर यांनी नितेश राणे यांना लगावला.
लोकशाहीमध्ये आपण निवडून आलो, आपली सत्ता आली म्हणजे आपण बाप झालो असे नाही. ही सत्तेची मस्ती आहे. जनता ही मस्ती लवकरच उतरवेल, असा थेट हल्लाबोल ओमराजे निंबाळकर यांनी केला.
नितेश राणे यांनी धाराशीवमध्ये एका सभेत भाषण केले. या भाषणादरम्यान सगळ्यांचा बाप म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री बसला आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. 2029 साली भाजपाचेच सगळे आमदार निवडून आले पाहिजेत, असं नितेश राणे म्हणाले होते. या विधानावर नितेश राणे यांचे बंधू निलेश राणे यांनीदेखील नाराजी व्यक्त केली आहे. महायुतीमधील वातावर चांगलं राहिलं पाहिजे. नितेश राणे यांनी जपून बोलावं, असं मत त्यांनी व्यक्त केलं.