कोल्हापूर : नागरिकांच्या सोयीसाठी केलेली ‘एक जिल्हा एक नोंदणी’ ही योजना सुरू होऊन महिना उलटला आहे, परंतु दस्त नोंदणीतील अनियमितता व गैरप्रकारांमुळे या योजनेच्या अंमलबजावणीबाबतच साशंकता निर्माण झाली आहे.
अनेक लोकप्रतिनिधी, संघटनांनी ही बाब पुराव्यानिशी सरकारच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार दस्त नोंदणीसाठी ‘मुद्रांक व नोंदणी’ विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना लागू करण्यात आल्या आहेत. याबाबतचे शासन परिपत्रक नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले. याची काटेकोर अंमलबजावणी न केल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कडक कारवाई होणार आहे.
‘एक जिल्हा एक नोंदणी’ मुळे जिल्हांतर्गत कोणत्याही भागातील दस्त नोंदणी कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात करण्याची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंतु दस्त नोंदणी करताना बनावट व्यक्तीस उभे करून नोंदणी करून घेणे, मृत व्यक्तीस जिवंत दाखवून नोंदणी करून घेणे, डोंगरी भागातील मोठ्या प्रकल्पांलगतच्या जमिनी शेतकऱ्यांची फसवणूक करून खरेदी व विक्री करणे, असे गैरप्रकार महिनाभरात समोर आले आहेत.
‘दस्त नोंदणीतील अनियमितता व गैरप्रकारांमुळे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांचे नुकसान होत होते. त्याकडे सरकारचे लक्ष वेधल्यानंतर त्याची दखल घेऊन याबाबतच्या मार्गदर्शक सूचनांचे शासन परिपत्रक जाहीर केले. याचे स्वागत आहे. सरकारने गैरसोयीची ‘एक राज्य एक नोंदणी’ ही योजना राबवू नये.
राजेंद्र कोंढरे, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय मराठा महासंघ