वरळीवासीयांच्या समस्या तातडीने सोडवा! आदित्य ठाकरे आक्रमक
Marathi June 10, 2025 08:25 AM

मुंबई महानगरपालिकेच्या जी/दक्षिण वरळी विभागात पावसाळा सुरू झाला तरी नालेसफाईसह अनेक कामे रखडलेली आहेत. त्यामुळे वरळीकरांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सहाय्यक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर यांची भेट घेऊन चर्चा केली.

वरळी विभागामध्ये अनेक पावसाळापूर्व कामे रखडली आहेत. यामध्ये अपूर्ण नालेसफाई, रस्त्यांची रखडलेली कामे, त्यामुळे होणारी वाहतूककोंडी आणि आरोग्यविषयक समस्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत. वरळीकरांच्या या समस्या सोडवण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी ही बैठक घेतली. फक्त दोन दिवस लागलेल्या पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी तुंबल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. या बैठकीला शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर, आमदार सुनील शिंदे, माजी महापौर किशोरी पेडणेकर, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, माजी उपमहापौर हेमांगी वरळीकर आदी उपस्थित होते.

ज्यांना मोठे केले, त्यांनीच स्वार्थ साधला

ज्यांना आम्ही शिवसेनेत आणले, मोठे केले त्यांनी सत्तेसाठी स्वार्थ साधला. मुंबई अदानीच्या घशात घालण्यासाठी ते पळून गेले. मात्र आज तुम्ही जी पापे करताय त्याची पुढील पिढीला काय उत्तरे देणार, हा खरा प्रश्न असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.