मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रत्येक पक्षाने कंबर कसली आहे. अशामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीतील घटकपक्ष हे एकत्र लढणार का वेगवेगळे? याबाबत अद्याप कोणीही अधिकृत घोषणा केलेली नाही. असे असताना राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी मोठे विधान केले. ते म्हणाले की, “लोकसभेला जे आमच्यासोबत होते तेव्हा चांगल काम झाला. पण विधानसभेत मित्रपक्षांनी आमचा फायदा करून घेतला.” असे विधान त्यांनी केली होते. यावरून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “महाविकास आघाडीमध्ये जागावाटप करताना घोळ झाल्याने त्याचा फटका हा विधानसभेच्या निवडणुकीत आम्हाला बसला.” असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे रोहित पवारांवर निशाणा साधला. (Sanjay Raut Shivsena UBT on Mahavikas Aaghadi and criticized PM Modi)
हेही वाचा : Mumbai BMC : अखेर बीएमसी इंजिनियर्सना बढत्या मिळणार, नव्या नोकरभरतीने रिक्त पदेही भरणार
“लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी अत्यंत ताकतीने लढली. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या हुकूमशाही विरुद्ध एक वातावरण, एक लाट आम्ही महाराष्ट्रात निर्माण केली. ती लाट विधानसभा निवडणुकीलादेखील होती. कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रामधील घटनाबाह्य सरकार जाणार, अशा प्रकारचे वातावरण होते. तरीही आम्हाला सत्ता मिळाली नाही. याचे कारण सर्वांना माहिती आहे. राहुल गांधी यांनी याच विषयावर प्रखर भाष्य केले आहे. ते सत्य देखील आहे. त्यामुळे आता कोण जबाबदार आहे? यासाठी दुसऱ्यांवर खापर फोडणे बरोबर नाही. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे काम केले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमचे काम केले आहे. त्यामुळे आता दोष देणे योग्य नाही,” असे संजय राऊत म्हणाले.
रोहित पवार म्हणाले होते की, “लोकसभेला जे आमच्यासोबत होते तेव्हा चांगल काम झाला. पण विधानसभेत मित्रपक्षांनी आमचा फायदा करून घेतला,” असे विधान केले होते. त्यावर संजय राऊत यांनी टीका केली. ते म्हणाले की, “जागा वाटपामध्ये काही वाद होते. विधानसभेच्या जागा वाटपात काही वाद निर्माण झाले होते आणि ते चुकीचे होते,” असे म्हणत त्यांनी निशाणा साधला. शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत पुढे म्हणाले की, “महाराष्ट्रामध्ये आजही महाविकास आघाडी एकत्रित काम करत आहे. पण हा स्थानिक स्वराज्य संस्थांचा विषय असल्यामुळे स्थानिक पातळीवर आमचे कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत, त्याचा विचार करणार आहोत. काही लोकांना काँग्रेससोबत जावे असे वाटते, तर काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेससोबत जावे असे वाटते. तर काही ठिकाणी वेगळा विचार करण्याचादेखील कार्यकर्त्यांचा विचार आहे. त्यामुळे या संदर्भात लवकरच उद्धव ठाकरे निर्णय जाहीर करतील,” असे त्यांनी स्पष्ट केले.