Raj Thackeray expressed anger over the continuous accidents of Dreamliners
Marathi June 13, 2025 05:25 PM


मुंबई : एअर इंडियाचे बोईंग 787 ड्रीमलाइनर विमान (AI171) आज (12 जून) दुपारी अहमदाबाद विमानतळावरून लंडनला जाण्यासाठी उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच कोसळले. या विमानातून 12 क्रू मेंबर्ससह 244 प्रवासी प्रवास करत होते. दरम्यान, या अपघातात आतापर्यंत किती प्रवाशांचा मृत्यू झाला, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी ड्रीमलाइनर्स या विमानांचा सातत्याने होणाऱ्या अपघाताबाबत संताप व्यक्त केला आहे. (Raj Thackeray expressed anger over the continuous accidents of Dreamliners)

अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातानंतर राज ठाकरे यांनी भलंमोठं ट्वीट केलं आहे. त्यांनी ट्वीट करताना म्हटले की, अहमदाबाद येथून लंडनला निघालेल्या विमानाचा अपघात झाला आणि त्यात अनेक प्रवासी आणि नागरिकांचा मृत्यू झाला. ही अतिशय दुःखद घटना आहे. या घटनेतील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली. तसेच मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे. याशिवाय जखमी लवकरात लवकर बरे होऊ देत आणि सुखरूप घरी जाऊ देत हीच ईश्वरचरणी प्रार्थना, असे म्हणत राज ठाकरे यांनी ड्रीमलाईनर्स या विमानांच्या आधीच्या अपघाताची आठवण करून सरकारवर निशाणा साधला आहे.

हेही वाचा – Accident : चार दिवसात चार अपघात; प्रवास नेमका कोणता सुरक्षित?

राज ठाकरे यांनी म्हटले की, विमान तंत्रज्ञानाबद्दल जरी मला खूप खोल माहिती नसली तरी माझ्या वाचनात काही गोष्टी याआधी आल्या होत्या, त्यातून मला काही प्रश्न पडले आहेत. बोईंगच्या ‘ड्रीमलाईनर’ विमानाबद्दल खूप तक्रारी होत्या. 2013 ला पहिल्यांदा जपान एअरलाईन्सच्या विमानाला आग लागली होती. त्यानंतर या विमानाबद्दल अनेक तक्रारी येतच होत्या. त्या इतक्या होत्या की, 2020 ते 2023 या काळात अनेकदा या विमानांच उड्डाण थांबवलं गेलं होतं. जानेवारी 2013 ला तर अमेरिकेपासून युरोपपर्यंत जवळपास सगळ्या मोठ्या विमान प्राधिकरणांनी साधारण 3 महिने बोईंग ड्रीमलाईनरचं उड्डाण खंडित केलं होतं. मला आठवतंय त्याप्रमाणे 2013 ला भारतात डीजीसीएने देखील काही काळासाठी या विमानाचं उड्डाण खंडित केलं होतं.

जर ड्रीमलाईनर बद्दल इतक्या तक्रारी आहेत, हे माहित असून सुद्धा आपण ही विमानं का वापरू देत होतो ? डीजीसीएने यावर कधीच कोणती कारवाई का नाही केली? असे प्रश्न उपस्थित करत राज ठाकरे म्हणाले की, आजच्या विमान अपघाताविषयी वाचताना अजून एक माहिती समोर आली. ती म्हणजे हे विमान 28 जानेवारी 2014 ला एअर इंडियाच्या सेवेत आलं. थोडक्यात जगभरात जेंव्हा ड्रीमलाईनरबद्दल तक्रारी होत्या त्याच दरम्यान आपण हे विमान ताफ्यात आणलं. ड्रीमलाईनरची सेवा 2020 ते 2023 च्या काळात अनेकदा जगभरात तांत्रिक कारणांमुळे खंडित झाल्याचा इतिहास असताना, एअर इंडियापासून अनेक विमान कंपन्यांनी 40 हून अधिक ड्रीमलायनर विमानांची ऑर्डर दिली? आणि या सगळ्याला सरकारने परवानगी का दिली? डीजीसीएने इतका पण विचार का नाही केला? असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले.

हेही वाचा – Plane Crash : राजकीय पक्षांनी जपले भान; विमान अपघातानंतर काँग्रेस आणि भाजपा मदतीसाठी सरसावले

राज ठाकरे म्हणाले की, ही वेळ हे सगळं बोलण्याची नाही, असं म्हणलं जाईल. तसेच जी घटना घडली ती दुःखद आहे, त्यामुळे सरकारने आता तरी या विषयावर गांभीर्य दाखवायलाच हवं. ड्रीमलाईनर्स जर मृत्यूचा सापळा बनणार असतील तर कुठलाही दबाव सहन न करता त्यांची सेवा खंडित करावी आणि वेळेआधीच त्यांची ऑर्डर रद्द करावी. मी जे सगळं मांडलं आहे, त्या विषयी न्यूयॉर्क टाइम्स, वॉलस्ट्रीट जर्नल, अल-जझीरा यामध्ये छापून आलं आहे. अल-जझीराने तर ड्रीमलायनरबद्दल एक डॉक्युमेंट्री पण केली आहे, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.





Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.