नाशिक: ओझर विमानतळासह शिर्डी विमानतळालाही नागरी उड्डाण मंत्रालयाच्या दृष्टीने विशेष महत्त्व असून, नाशिकच्या हवाई कनेक्टिव्हिटीसाठी लवकरच महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती नागरी उड्डाण व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज (ता.११) दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या ११ वर्षपूर्तीनिमित्त नाशिक येथील भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. मोहोळ बोलत होते.
ते म्हणाले, ‘मोदी सरकारने देशाला पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त प्रशासन दिले आहे. देशाची अर्थव्यवस्था दहाव्या स्थानावरून चौथ्या क्रमांकावर झेपावली असून, ‘सुरक्षित भारत, समृद्ध भारत’ या संकल्पनेला दिशा दिली आहे.’ मोदी सरकारने २५ कोटी नागरिकांना गरिबीच्या विळख्यातून मुक्तता, १२ कोटींहून अधिक शौचालयांची उभारणी, २० कोटी महिलांच्या खात्यात थेट पैसे जमा, महाराष्ट्रासाठी केंद्राकडून १०.५ लाख कोटींची आर्थिक मदत, वैद्यकीय शिक्षणासाठी ७५ हजार नवीन जागा, मध्यमवर्गीयांसाठी १२ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न करमुक्त, खरीप पिकांचा हमीभाव ५५० रुपयांनी वाढवला, २ लाख कोटी रुपयांचे तरुणांसाठी विशेष पॅकेज व नागरिकांसाठी हेल्थ कार्ड वितरणाचे बहुमूल्य काम केले आहे.
नाशिक व शिर्डी विमानसेवा बळकट करण्याचा प्रयत्न
प्रयागराज कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विमानसेवेचा वाढता वापर लक्षात घेता, येत्या नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी ओझर विमानतळावर सुविधा बळकट केल्या जाणार आहेत. शिर्डी विमानतळालाही आधुनिक सुविधा देऊन त्याची अन्य शहरांशी अधिक चांगली जोडणी केली जाणार आहे. या दोन्ही विमानतळांच्या पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यासाठी लवकरच बैठक होणार असल्याचेही श्री. मोहोळ यांनी स्पष्ट केले.
स्थानिक निवडणुका व सहकार क्षेत्र
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्यात येईल. मात्र, काही ठिकाणी स्थानिक परिस्थितीनुसार स्वतंत्र निर्णय घेण्यात येतील. राज्यातील सहकारी बँकांना सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने ९ हजार कोटींचा निधी राज्य सरकारला दिला असल्याचा दावा देखील श्री. मोहोळ यांनी केला.