नागपूर : अहमदाबाद येथून लंडनला निघालेले विमान गुरुवारी दुपारी अवघ्या काही मिनिटातच कोसळून २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला. यानंतर रात्री अहमदाबादहून नागपूरला येणाऱ्या विमानातील प्रवाशांच्या मनात नागपूरला पोहोचतपर्यंत १ तास ५४ मिनिटे अक्षरशः घालमेल सुरू होती.
अपघाताच्या त्या घटनेनंतर या विमानातील प्रवासी चक्क दहशतीच्या सावटाखाली वावरत होते. जणू आपल्या विमानालाही काही होणार तर नाही अशी अनाहुत भीती त्यांच्या मनात विमान नागपुरात विमान लॅंड करेपर्यंत घर करून होती. नागपुरात सामान्यपणे या विमानाचे लँडिंग होताच सर्व प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेतला. अहमदाबाद दुर्घटनेत नागपूरकर यशा कामदार, त्यांचा दीड वर्षीय मुलगा रुद्र मोढा आणि सासू रक्षा मोढा यांचा मृत्यू झाल्याने उपराजधानीत हळहळ व्यक्त होत आहे.
अहमदाबादवरून लंडनकडे निघालेले एअर इंडियाचे विमान उड्डाण करताच कोसळले. त्यामुळे काही काळ अहमदाबाद विमानतळावरील वाहतूक थांबविण्यात आली होती. काही विमाने रद्द करण्यात आली तर काही विमाने इतरत्र वळविण्यात आली. काही विमानांच्या उड्डाणांना उशीर झाला. भयानक अपघात होऊन २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला ही माहिती कळल्यावर सायंकाळी अहमदाबाद येथून नागपूरसाठी येणारे प्रवासी नागपूरला सुखरूप पोहचेपर्यंत चांगलेच भीतीखाली होते. त्यातच या विमानात नागपुरातील एका प्रवाशाचा समावेश होता, हे माहीत झाल्यावर ही भीती आणखीच वाढली होती.
नागपूर आणि अहमदाबाद या दरम्यान तीन विमान आहेत. तिन्ही विमानांची सेवा इंडिगोची असून ६ ई ७५०२ हे विमान सकाळी ५ वाजून ५५ मिनिटांनी येथून रवाना होते आणि सकाळी ८ वाजून ३५ मिनीटांनी उतरते. हेच विमान ६ ई ७२४६ या क्रमांकाने सकाळी ८ वाजून ३५ मिनीटांनी अहमदाबादसाठी रवाना होते. आज सकाळी १०.३० मिनीटांनी हे विमान निर्धारित वेळेनुसार अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. दुपारी अपघात झाल्याने सायंकाळी ६ वाजून ५५ मिनीटांनी नागपूरला जाणाऱ्या विमानातील प्रवाशांची धाकधूक वाढली होती.
विमान उडणार की रद्द होणार ही माहिती मिळत नव्हती. अखेर चार वाजता धावपट्टी खुली केल्यावर नागपूरचे विमान रवाना होणार असे घोषित करण्यात आले. विमानाची वेळ ६ वाजून ५५ मिनीटे असली तरी त्यावेळी ‘चेक इन'' सुरू झाले. प्रत्येक प्रवाशाच्या चेहऱ्यावर एकप्रकारची भीती दिसून येत होती. अखेर ६ ई ७२४७ क्रमांकाचे हे विमान ७ वाजून ३१ मिनीटांनी नागपूरसाठी रवाना झाले. विमान आकाशात झेपावल्यावर काही प्रवाशांनी एकर इंडियाच्या विमानाचे अपघात स्थळ पाहण्याचा व आपल्या कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रयत्न केला.
या घटनेच्या पार्श्वभूमीमुळे बऱ्याच प्रवाशांनी भीतीच्या सावटाखाली प्रवास केला, अशी माहिती एका प्रवाशाने दिली. निर्धारित वेळेनुसार ८ वाजून ५५ मिनीटांनी येणारे हे अखेर रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यावर अनेकांनी सुटकेचा श्वास सोडला. दरम्यान, अपघाताच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर विमानतळावर प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली आहे. मात्र, इतर सर्वच विमानसेवा नियमित आणि वेळेवर होत्या हे विशेष.