नागपूर : केंद्र सरकारने ११ वर्षांत देशभरात विविध धर्मियांच्या धार्मिक स्थळांचा विकास केला. ही स्थळे एकमेकांशी जोडण्यात आली. त्यावर एक लाख कोटी खर्च झाले. यातून ५० लाख लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळून सुमारे २ लाख कोटींचे उत्पन्न मिळाल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राममंदिर, बुद्धिस्ट सर्किट, चारधाम, पालकी मार्ग, बेट द्वारका, अमरनाथ आणि चौरासी कोसी परिक्रमा विविध राष्ट्रीय महामार्गाद्वारे जोडण्यासाठी १ लाख कोटींच्या प्रकल्पावर काम केले. बहुतांश कामे पूर्ण झाली. काही लवकरच मार्गी लागणार असून त्यातून ५० लाखांवर लोकांना गाईड, ट्रान्सपोर्ट, दुकानदार, लॉंजिंग, फुडसह प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार मिळाला. याशिवाय यामुळे देशातील धार्मिक पर्यटन चारपटींनी वाढले. काँग्रेसच्या काळाच्या तुलनेत मोदी सरकारच्या ११ वर्षांच्या काळात १.६ पटींनी अधिक राष्ट्रीय महामार्ग तयार झाले. २००४ ते २०१४ दरम्यानच्या दहा वर्षांत ९१ हजार २८७ किमीचे मार्गाचे महामार्ग झाले. तर २०१४ ते २०२४ दरम्यान दहा वर्षांत १ लाख ४६ हजार २०४ किमी रस्ते झाले आहेत.
तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या खडगपूर- मोरेग्राम कॅरिडोर,आगरा- ग्वालियर कॅरिडोर, थराड- डीसा- महसाना- अहमदाबाद कॅरिडोर, अयोध्या रिंग रोड, रायपुर- रांची (पत्थलगांव- गुमला), कानपुर रिंग रोड, गुवाहाटी रिंग रोड, एलिवेटेड नासिक फाटा- खेड मार्ग, गोविंदघाट- हेमकुंड साहिब रोपवे, सोनप्रयाग- केदारनाथ रोपवे, सोनप्रयाग- केदारनाथ रोपवे, जेएनपीटी पोर्ट (पगोटे) चौकापर्यंत सहा लेन ॲक्सिस कंट्रोल्ड मार्ग, जीरकपुर बाईपास (चंदीगड बाईपास), बादवेल- नेल्लोडसह इतर अशा एकूण १ लाख २५ हजार कोटींच्या प्रकल्पाला मंजूरी मिळाली आहे, अशी माहिती गडकरी यांनी दिली.
लिबर्टीजवळ उड्डाणपुलात करणार बदलमानकापूर चौकातून लिबर्टी चौकापर्यंतचा उड्डाणपूल डोकेदुखी ठरला आहे. संविधान चौकाकडून थेट कामठी मार्ग एलआयसी चौकात बंद करण्यात आल्याने नागरिकांना सदरकडून फेरा घेऊन जावे लागत आहे तर अनेकजण या उड्डाणपूलावरून ‘यू टर्न’ घेऊन कामठी मार्गाकडे वळत असल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. मात्र, आता यात बदल करणार असून यासाठी ३४ कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती केंद्रियमंत्री यांनी दिली.
११ वर्षातील कामे
८१ कोटी गरीबांना अन्न योजनेतून मोफत रेशन
४ कोटीपेक्षा अधिक प्रधानमंत्री आवास योजनेतून घर दिले
मोदी सरकारने केले १.६ पटींनी अधिक रस्ते
५१ कोटी लोकांना सुरक्षा विमा योजनेत लाभ
किसान सन्मान योजनेतून ३.७ कोटीचे वाटप
२०१४ ते २०२४ कालावधीत १५ एम्स
७ आयआयटी, ८आयआयएम
४९० विद्यापीठांची निर्मिती
५५ कोटी लोकांना ५ लाखांचे वार्षिक मोफत उपचार
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ९ दहशतवादी तळ उध्वस्त
कलम ३०७ आणि ३५ अ हटविण्यात यश
उडाण योजनेअंतर्गत ८६ नवीन विमानतळ जोडणी
१३६ जागतिक दर्जाच्या वंदे मातरम ट्रेन
१,२५ लाख कोटींच्या प्रकल्पांना मंजूरी
माल वाहतूकीच्या खर्चत ६ टक्यांनी घट