अमरावती – शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी एक आठवड्यापासून अन्नत्याग आंदोलन केले. त्यांच्यासोबत प्रहार संघटनेचे अनेक कार्यकर्ते देखील उपोषण करत होते. आज (14 जून) राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत सरकारचा निरोप घेऊन उपोषणकर्ते बच्चू कडू यांच्या भेटीसाठी मोझरी येथे पोहचले. जिल्हाधिकारी आणि सरकारच्यावतीने त्यांनी एक पत्र बच्चू कडू यांना दिले. शेतकरी कर्जमाफीसाठी 15 दिवसांच्या आत उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे आश्वासन सरकारच्या वतीने मंत्री उदय सामंत यांनी दिले आहे. दिव्यांगांच्या मानधन वाढीसाठी 30 जून रोजी बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आले. सरकार हे शेतकरी आणि दिव्यांगांच्या पाठीशी आहे, असेही उदय समांत यांनी स्पष्ट केले. त्यानंतर बच्चू कडू यांनी आंदोलन स्थगित केले. आंदोलन स्थगित करण्यात आले असले तरी शेतकरी कर्जमाफीची तारीख 2 ऑक्टोबरपर्यंत जाहीर केली नाही तर मंत्रालयात घुसण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. गांधी जयंतीला शहिद भगतसिंगांच्या मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.
मंत्री उदय सामंत म्हणाले की, आमचं पत्र हे आमचा वचननामा समजून आंदोलन मागे घ्यावे. त्यानंतर सात दिवसांपासून सुरु असलेले बच्चू कडू यांचे आंदोलन मागे घेतले गेले आहे. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज बच्चू कडू यांची उपोषणस्थळी भेट घेतली. उदय सामंत यांची शिष्टाई फळाला आली. बच्चू कडू यांच्या मागण्या पूर्ण करणे ही आमचीही जबाबदारी आहे. कर्जमाफीसाठी 15 दिवसांत समिती स्थापन करण्यात येईल. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या बच्चू कडू यांच्या प्रकृतीची काळजी घेण्याची आमची जबाबदारी आहे. एखादी मागणी राहिली तर उपोषणाचे आयुध तुम्ही पुन्हा एकदा काढू शकता, असेही उदय सामंत म्हणाले. बच्चू कडू यांच्या भेटीनंतर उदय सामंत यांनी दोन प्रमुख मागण्यांसंबधी सरकारची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, शेतकरी कर्जमाफीसाठी 15 दिवसांच्या आत उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाईल. समितीचा अहवाल आल्यानंतर कर्जमाफीवर निर्णय घेतला जाईल. दिव्यांगांच्या मागण्यांसाठी समिती स्थापन केली जाईल, असेही आश्वासन मंत्री सामंत यांनी दिले. त्यानंतर बच्चू कडू यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. एखाद्या गोष्टीसाठी बच्चू कडू कशा पद्धतीने आक्रमक आंदोलन करतात हे सर्वांनी पाहिले आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या वतीने त्यांना विनंती करतो की, त्यांनी आंदोलन मागे घ्यावे.
त्यांच्या काळजीपोटी आणि शेतकऱ्यांच्या काळजीपोटी त्यांनी आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती मंत्री सामंत यांनी केली.
उपोषण मागे घेण्याची घोषणा करताना बच्चू कडू यांनी 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीला शहिद भगतसिंगांच्या मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. 2 ऑक्टोबर पर्यंत कर्जमाफीची तारीख जाहीर केली नाही तर मंत्रालयात घुसण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. ते म्हणाले की, जातीच्या नावाने आंदोलने झाली, धर्माच्या नावाने फुट पाडण्याचे प्रयत्न झाले, मात्र आमच्या आंदोलनामुळे या राज्यातील शेतकरी जिवंत आहे हे पुन्हा एकदा दाखवून दिले. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी हे आंदोलन होते. सर्व जाती, धर्माचे शेतकरी या आंदोलनात एकजुटीने सहभागी झाले, हे या आंदोलनाचे यश आहे.
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन आम्ही दिलेले नाही, असे म्हटले होते. मात्र बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतर आता तेही कर्जमाफीसाठी आम्ही सकारात्मक आहोत, असे बोलायला लागले आहेत, हे देखील आंदोलनाचे यश असल्याचे बच्चू कडू म्हणाले.
हेही वाचा : Ajit Pawar : अजित पवारांच्या कार्यक्रमात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ; उपमुख्यमंत्री म्हणाले…