- अमोल शिंदे
काही गोष्टी केवळ आरंभ करणे पुरेसे नसते, तर त्या दीर्घकालीन परिवर्तनासाठी बिंबवाव्या लागतात. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA)तर्फे आयोजित केलेली पहिलीच ‘महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग’ (WMPL) ही स्पर्धा म्हणजे अशाच एका ऐतिहासिक पावलाची सुरुवात आहे, ॉ
ज्यामुळे केवळ महाराष्ट्रातील नवोदित महिला खेळाडूंनाच नव्हे, तर संपूर्ण देशातील महिला क्रिकेट संघटनांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण उभे राहिले आहे.
स्पर्धेचा प्रारंभ : दूरदृष्टीची कल्पक कृती२०२३ मध्ये सुरू झालेली महाराष्ट्र प्रीमियर लीग (MPL) ही पुरुष क्रिकेटसाठी एक व्यासपीठ ठरली. यामध्ये अर्शिन कुलकर्णीसारखे अनेक खेळाडू आयपीएल पातळीपर्यंत पोहोचले. याच यशाची पुनरावृत्ती महिला क्रिकेटमध्ये व्हावी आणि त्या खेळाडूंनाही समांतर संधी मिळावी, हा एमसीए अध्यक्ष रोहित पवार व सर्व अपेक्स कमिटीचा दृष्टिकोन होता. हा निर्णय केवळ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह नव्हता, तर सामाजिकदृष्ट्या परिवर्तन घडवणारा होता.
आज भारतात पुरुष क्रिकेटर्सला मिळणाऱ्या संधी, प्रसिद्धी, आर्थिक पाठबळाच्या तुलनेत महिला क्रिकेट अजूनही उपेक्षित आहे. अशा पार्श्वभूमीवर, एक संपूर्ण फ्रँचायझी-आधारित महिला टी-२० स्पर्धा फक्त महाराष्ट्रात सुरू होणे, ही सामाजिक समतेसाठी आणि महिला सशक्तीकरणासाठीही महत्त्वाची घडामोड ठरते.
स्पर्धेची रचना आणि दर्जा : राष्ट्रीय पातळीवर साजेसाडब्ल्यूएमपीएलमध्ये चार संघ - पुणे वॉरियर्स, सोलापूर स्मॅशर्स, रत्नागिरी जेट्स आणि रायगड रॉयल्स सहभागी झाले. प्रत्येक संघामध्ये स्थानिक महिला क्रिकेटपटू, भारतीय संघातील आयकॉन खेळाडू, नवोदित खेळाडू आणि आगामी संभाव्य तारे यांचा मेळ होता.
स्मृती मानधना, अनुजा पाटील, तेजल हसबनीस आणि किरण नवगिरे या चार आयकॉन खेळाडूंची निवड ही एमसीएच्या दूरदृष्टीचेच द्योतक होते. त्यांच्यासोबत खेळण्याचा अनुभव हा अनेक नवोदित खेळाडूंसाठी स्वप्नवत ठरला.
विशेष म्हणजे, लिलावात तेजल हसबनीस ही सर्वाधिक बोली लागलेली खेळाडू ठरली. अनेक नवोदित खेळाडूंना चांगल्या रकमेची बोली लागली व त्यांना संघात समाविष्ट करण्यात आले. यामध्ये महिला क्रिकेटमध्ये आर्थिक मूल्यनिर्धारणाची नवी दिशा दिसून आली.
पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि थेट प्रक्षेपण : आयपीएल समकक्ष दर्जास्पर्धेतील सर्व सामने पुण्यातील एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात आले. जिओ हॉटस्टारवर थेट प्रक्षेपण झाल्यामुळे देशातील लाखो कुटुंबांपर्यंत महाराष्ट्रातील महिला क्रिकेट पोहोचले. विशेष म्हणजे, अनेक सामने विद्युत प्रकाशझोतात खेळवले गेले, जे छोट्या शहरातून व ग्रामीण भागातून आलेल्या अनेक महिला खेळाडूंना प्रथमच अनुभवता आले.
त्याचबरोबर, डीआरएस, मल्टी-कॅम अँगल्स, इन-मॅच ग्राफिक्स, स्ट्रॅटेजीक टाईम आऊट यांचा वापर केल्यामुळे स्पर्धेचा दर्जा IPL व WMPL च्या तोडीसतोड ठरला. यामुळे खेळाडूंना केवळ मोठ्या व्यासपीठावर खेळण्याची संधी तर मिळालीच; पण त्यासोबत प्रोफेशनल क्रिकेटचा अनुभवसुद्धा मिळाला.
खेळाडूंचा आत्मविश्वास - नवे युग, नवे पर्वया स्पर्धेने अनेक नवोदित चेहऱ्यांना क्रिकेटविश्वात ठळक ओळख मिळवून दिली.
उदाहरणार्थ :
चिन्मयी बोरफळे (परभणी) - पुणे वॉरियर्ससाठी खेळताना सर्वाधिक विकेट घेऊन पर्पल कॅपची मानकरी ठरली.
ईश्वरी सावकार (नाशिक) - सोलापूर स्मॅशर्सकडून सलामीला फलंदाजी करत ऑरेंज कॅप जिंकली.
गौतमी नाईक - रत्नागिरी जेट्सकडून खेळताना गौतमीने आपल्या आक्रमक अष्टपैलू खेळाने सर्वांना प्रभावित केले.
खुशी मुल्ला - पुणे वॉरियर्स संघाला अटीतटीच्या लढाईत आपल्या अष्टपैलू खेळाने सामने जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली.
याशिवाय शरयू कुलकर्णी, शाल्मली क्षत्रिय, आचल अग्रवाल, प्रियंका घोडके, आरती केदार व इतर अनेक या सर्व खेळाडूंनी उल्लेखनीय प्रदर्शन करत WMPL स्काऊट्सचे लक्ष वेधले.
या खेळाडूंमधील बऱ्याचशा जणी ग्रामीण भागातून, सामान्य कुटुंबातून आलेल्या आहेत. त्यांच्या यशामध्ये वाटा आहे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने निर्माण केलेले व्यासपीठ आणि समान संधीच्या धोरणाचा.
या स्पर्धेमध्ये सर्व संघांच्या कप्तानांनी ज्या प्रकारे सामन्यांमध्ये रणनीती आखली, प्रेशरमध्ये निर्णय घेतले, तो अनुभव नवोदित खेळाडूंना सामान्य शिबिरात मिळणे अशक्य आहे. अंतिम सामन्याच्या शेवटच्या ओव्हरमध्ये अनुजा पाटीलने हातातून निसटलेला सामना आपल्या गोलंदाजीद्वारे जिंकवून दिला.
सोलापूर स्मॅशर्सला दोन चेंडूंवर दोन धावांची गरज असताना, अनुभवी अनुजा पाटीलने दोनही चेंडूंवर विकेट घेत सामना फिरवला. हा केवळ एक क्रिकेट मोमेंट नाही, तर अनुभव, संयम आणि खेळातील मानसिक ताकद यांचे प्रत्ययकारी उदाहरण आहे.
सामाजिक समावेशकता आणि मोफत प्रवेश - खऱ्या अर्थाने ‘जनतेची स्पर्धा’महत्त्वाची गोष्ट म्हणजे, WMPL चे प्रवेश तिकीट सर्वांसाठी मोफत होते. यामुळे कुटुंबासोबत आलेल्या मुली, महिला क्रिकेटरसिक, विद्यार्थी यांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर दिसून आला. मैदानावर आणि स्टेडियमच्या बाहेरचा क्रिकेटर रसिकांचा उत्साह WPL पेक्षा काही कमी नव्हता. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने कोणताही भेदभाव यामध्ये फरक न करता सर्वांना समान संधी देणारा उपक्रम राबवला.
एमसीएचे दीर्घकालीन उद्दिष्ट - केवळ स्पर्धा नव्हे, एक चळवळएमसीएने महिला क्रिकेटसाठी फक्त एक स्पर्धा आयोजित केली नाही, तर संपूर्ण यंत्रणा आणि धोरण विकसित केले आहे. आज एमसीएतर्फे महिला इन्व्हिटेशन स्पर्धांच्या संख्येत लक्षणीय वाढ करण्यात आली.
या स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महिला खेळाडूंना महाराष्ट्राच्या व पुढे जाऊन भारताच्या विविध वयोगटांतील संघासाठी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्रातील महिला क्रिकेटचा पाया आता संधी, गुणवत्ता, अनुभव, प्रशिक्षण आणि आर्थिक प्रोत्साहन या पंचसूत्रांवर उभा राहिला आहे.
एका चळवळीचा प्रारंभआज देशभरात महिलांसाठी अशी प्रादेशिक फ्रँचायझी टी-२० स्पर्धा आयोजित करणारा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन ही एकमेव राज्य क्रिकेट संघटना ठरली आहे. अन्य राज्यांमध्येही आता अशा स्पर्धांची मागणी होऊ लागली आहे. यातून एमसीएने पुन्हा एकदा देशाला दिशा देणारे संघटन म्हणून स्वतःची ओळख अधोरेखित केली आहे.
डब्ल्यूएमपीएल : खेळाच्या पलीकडचा विजयआज जेव्हा परभणी, धुळे, सिंधुदुर्ग, बीड यांसारख्या छोट्या शहरातून आलेल्या खेळाडू एमसीए स्टेडियममध्ये स्मृती मानधनाबरोबर फलंदाजी करतात किंवा तेजल हसबनीस व अनुजा पाटीलसोबत रणनीती आखतात, तेव्हा त्यांना मिळणाऱ्या केवळ धावा किंवा विकेट नव्हे, तर तो अनुभव त्यांच्या आयुष्याला दिशा देणारा ठरतो.
‘महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग’ म्हणजे महाराष्ट्राने दाखवलेले सामाजिक भान आणि क्रिकेटमधील समतेच्या दिशेने उचललेली एक भक्कम पायरी आहे. ही स्पर्धा केवळ खेळात नव्हे, तर समाजाच्या विचारात बदल घडवणारी ठरते आहे.
जर राज्यस्तरीय महिला क्रिकेट स्पर्धा महाराष्ट्रात यशस्वी ठरू शकते, तर ती इतर राज्यांत का नाही? हा प्रश्न आता इतर संघटनांपुढे उभा आहे आणि हीच WMPL ची खरी जमेची बाजू आहे. ही केवळ ट्रॉफीची स्पर्धा नाही, तर ती देशातील महिला क्रिकेटसाठी दिशा देणारी चळवळ आहे.