इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील कसोटी मालिकेला 20 जूनपासून सुरुवात होत आहे. या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेआधी टीम इंडियात हेड कोच गौतम गंभीर याचं कमबॅक झालं आहे. गंभीरने 18 जून टीम इंडियाच्या खेळाडूंसह सरावादरम्यान संवाद साधला. गंभीरच्या कमबॅकमुळे टीम इंडियात आनंदाचं वातावरण आहे. इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील पहिला सामना हा हेडिंग्ले लीड्स येथे खेळवण्यात येणार आहे. या मालिकेत शुमन गिल टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर ऋषभ पंत याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी आहे.
गौतम गंभीर यांना 11 जून रोजी भारतात परतावं लागलं होतं. गौतम गंभीर यांच्या मातोश्रींना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.त्यामुळे गंभीर तातडीने भारतात परतला. त्या दरम्यान टीम इंडिया विरुद्ध इंडिया ए यांच्यात एन्ट्रा स्क्वॉड मॅच खेळवण्यात येत होती. तेव्हा गंभीर भारतात परतला होता. मात्र आता गंभीरच्या आईची तब्येत व्यवस्थित आहे. त्यामुळे गंभीर पुन्हा एकदा टीमसह जोडला गेला आहे.
गंभीरच्या गैरहजेरीत सहाय्यक प्रशिक्षक सीतांशु कोटक आणि रियान टेन डेस्काटे या दोघांनी टीम इंडियाच्या खेळाडूंना सरावादरम्यान मार्गदर्शन केलं. तसेच बॉलिंग कोच मॉर्ने मोर्कल यांनीही योगदान दिलं.
इंग्लंड आणि टीम इंडियाची ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 साखळीतील पहिलीच मालिका आहे. या मालिकेसाठी टीम इंडियात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे हेड कोच गौतम गंभीर आणि कॅप्टन शुबमन गिल या दोघांची या पहिल्या कसोटीत टीम इंडियासाठी काय रणनिती आहे? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तसेच विजयी सुरुवात करायची असल्याने टीम इंडियाच्या खेळाडूंना योगदान द्यावं लागेल.
उभयसंघातील दुसरा सामना हा 2 जूलैपासून एजबेस्टन येथे होणार आहे. तर तिसका सामना 10 जुलैपासून लॉड्स स्टेडियममध्ये होणार आहे. चौथ्या सामन्याचं आयोजन हे 23 जुलैपासून मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्डमध्ये करण्यात आलंय. तर पाचवा आणि अंतिम सामना हा 31 जुलै रोजी लंडनमधील केनिंग्टन ओव्हलमध्ये होणार आहे. टीम इंडियाला गेल्या 18 वर्षांपासून इंग्लंडमध्ये एकदाही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. टीम इंडियाने गेल्या इंग्लंड दौऱ्यात 5 सामन्यांची मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवली होती.