जळगाव : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (19 जून) वर्धापन दिनादिवशी भाजपसह महायुती सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबद्दल उद्धव ठाकरेंनी टीका करताना म्हणाले की, मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाचे नोकर इकडेतिकडे गाठीभेटी घेत आहेत, अशी टीका केली. एवढेच नव्हे तर, ‘जर तुम्ही शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड तुम्ही पुसून टाकणार असाल तर महाराष्ट्राच्या धरतीवरुन तुमचे नाव पुसून टाकणार आहोत. भाजपचे नामोनिशाण पुसून टाकू, असा इशारा त्यांनी भाजपला दिला. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वाक्यात प्रत्युत्तर केले. (CM Devendra Fadnavis on Shivsena UBT Uddhav Thackeray allegations)
हेही वाचा : ECI : निवडणुकीचे व्हिडीओसह फोटो 45 दिवसांत नष्ट करा, केंद्रीय निवडणूक आयोगाचे राज्यांना निर्देश
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरेंच्या टीकेबद्दल विचारले. तेव्हा ते म्हणाले की, “बोलबच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तर देत नाही.” असे ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि. 20) जळगाव दौऱ्यावर आले असताना माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजप प्रवेशाची इच्छा व्यक्त केली होती. जळगाव दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री फडणवीस हे एकनाथ खडसे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. त्यावरून त्यांना विचारले असता म्हणाले की, खडसेंच्या भेटीबाबत मला माहिती नाही.
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक, हिंदू गोर बंजारा आणि लबाना समाज कुंभ प्रेरणा स्थळाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. “आमच्या आदिवासी स्वातंत्र्य संग्राम सेनानी यांचा गौरव झाला पाहिजे. या दृष्टीने वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम हाती घेतले आहेत. या ठिकाणी खाज्याजी नाईक यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांचा प्रचंड मोठा सहभाग होता. याआधी मी याच स्मारकाच्या भूमीपूजनासाठी आलो होतो. आता त्याच्या उद्घाटनासाठी येण्याची संधी मला मिळाली. मला त्याचा आनंद आहे,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.