
ठाणे महापालिकेच्या तत्कालीन सह आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर अतिक्रमण हटवत असताना कोविड काळामध्ये जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपी अमरजीत सिंह यादव या फेरीवाऱ्याला शुक्रवारी 307 च्या गुन्ह्यात दोषी ठरवत 7 वर्षांच्या सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणल्याबद्दल व सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याबद्दल अमरजीत याला न्यायालयाने त्याला 3 वर्षाची व दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्याप्रमाणे कलम 237 नुसार 2 वर्षाची शिक्षा व दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच मुंबई कायदा कलम 37/1/3 नुसार आरोपीला दोषी धरत 2 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. ही सगळी शिक्षा सक्त मजुरीची आहे.
या खटल्यात सरकारी वकील म्हणून अॅड. शिशिर हिरे यांनी काम पाहिले. तसेच सुनावणीवेळी खटल्यात एकूण 21 साक्षीदार तपासण्यात आले होते. तपासाअंती अमरजीत सिंग यादव याने केलेला हल्ला हा जीवघेणा होता हे सरकारी वकिल शिशिर हिरे यांनी न्यायालयात सिद्ध केले.
काय आहे प्रकरण?
घोडबंदर रोड येथील कासारवडवली परिसरात कल्पिता पिंपळे आणि त्यांचे अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर अमरजितसिंह यादव या माथेफिरू फेरीवाल्याने जीवघेणा हल्ला केला होता. यामध्ये पिंपळे यांची दोन व पालवे यांचे एक बोट तुटले होते.