पुन्हा पवार विरुद्ध पवार… माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक एवढी प्रतिष्ठेची का? गणित काय? समजून घ्या 5 मुद्द्यात
GH News June 20, 2025 07:06 PM

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काका विरुद्ध पुतण्या अर्थात शरद पवार विरुद्ध अजित पवार हा सामना रंगला होता. दिल्लीच्या निवडणुकीनंतर आता पवार काका पुतण्या गल्लीतील निवडणुकीतही आमने सामने उभे ठाकले आहेत. निमित्त आहे बारामतीतील माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीचं. या निवडणुकीत अजित पवार यांनी आपलं पॅनल उभं केलं आहे. एवढंच नव्हे तर अजित पवार हे स्वत: चेअरमन पदाच्या निवडणुकीसाठी मैदानात उभे ठाकले आहेत. तर कारखान्यावर वर्चस्व राखण्यासाठी शरद पवार यांनीही शड्डू ठोकला आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने रोज सभा होत आहेत. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असून बारामतीचं राजकारण ढवळून निघालं आहे. बारामतीतील या माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक का एवढी प्रतिष्ठेची केली? या मागचं कारण काय आहे? या निवडणुकीचं गणित तरी नेमकं काय आहे? याचाच घेतलेला हा वेध.

किती आणि कोणते पॅनल मैदानात?

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित यांनी या निवडणुकीत नीलकंठेश्वर पॅनल उभं केलं आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचं बळीराजा सहकार बचाओ पॅनल मैदानात उतरलं आहे. या पॅनलचे नेतृत्व युगेंद्र पवार करत आहेत. तसेच चंद्रराव तावरे यांचा सहकार बचाओ शेतकरी पॅनल आणि अपक्षांचा आणखी एक पॅनल या निवडणुकीत उतरलेला आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक 22 जून रोजी पार पडणार आहेत, तर 24 जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकात 21 जागांसाठी 90 उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत.

किती मतदार मतदान करणार?

सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सर्वसामान्य नागरिकांना मतदान करता येत नाही. जे ऊस उत्पादक शेतकरी कारखान्याचे भागधारक आहेत, त्यांनाच मतदान करण्याचा अधिकार असतो. माळेगाव काराखान्याच्या अंतर्गत बारामती तालुक्यातील सुमारे 37 गावे येतात. यात सुमारे 20 हजार भागधारक आहेत. जे या निवडणुकीत मतदान करणार आहेत. शरद पवार हे देखील भागधारक आहेत, त्यामुळे तेही मतदान करणार आहेत.

निवडणूक एवढी प्रतिष्ठेची का?

अजित पवार हे तब्बल 41 वर्षांनंतर साखर कारखान्याच्या निवडणुकीत उतरले आहेत. याआधी ते 1984 मध्ये इंदापूर येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उतरले होते आणि त्यांनी विजयही मिळवला होता. मात्र आता पुन्हा एकदा ते साखर कारखान्याच्या निवडणुकीत नशीब आजमावत आहेत. ही निवडणूक अजिप पवार आणि शरद पवार या दोघांसाठीही प्रतिष्ठेची आहे. अजित पवार हे शरद पवारांपासून वेगळे झाल्यानंतरची ही तिसरी निवडणूक आहे. सर्वप्रथम लोकसभा निवडणूकीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला होता, मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी पुनरागमन करत बारामतीचा गड राखला होता. मात्र आता अजित पवारांसमोर शरद पवारांसह चंद्रराव तावरे यांचेही आव्हान असणार आहे.

पवार आणि तावरे यांच्यातील इतिहास काय आहे?

पवार आणि तावरे यांच्यात राजकीय वैर आहे. शरद पवार राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात व्यस्त असताना तावरे गटाने स्थानिक सहकारी क्षेत्रावर वर्चस्व ठेवले होते. पवार कुटुंबाने अनेक लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जिंकल्या मात्र सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकीत तावरे यांचाच वरचष्मा होता. गेल्या तीन दशकांत त्यांनी कारखान्याच्या निवडणुकीत पवारांच्या नेतृत्वाखालील पॅनलचा अनेकदा पराभव केलेला आहे. 2019 मध्ये चंद्रराव आणि रंजन तावरे भाजपमध्ये सामील झाले. मात्र अजित पवार भाजपसोबत आल्यामुळे त्यांनी अजित पवारांसाठी काम केले होते.

राजकारणावर काय परिणाम होणार?

राज्यात आणि केंद्रात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती आहे, मात्र भाजपने तावरे यांना निवडणुकीतून माघार घेण्यास सांगितलेलं नाही. याचा अर्थ भाजपही बारामतीत आपला पाया मजबूत करत असल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे शरद पवारांच्या पॅनलचे नेतृत्व युगेंद्र पवार करत आहेत. युगेंद्र यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता, याचा बदला घेण्याचा प्रयत्न युगेंद्र यांचा असणार आहे. त्यामुळे आता मतदार माळेगाव कारखान्याच्या चेअरमन पदाची माळ कोणाच्या गळ्यात टाकतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.