चिंचवड, ता.२१ ः जगतगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिका आणि गुणवंत कामगार कल्याण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते नाशिक फाटा या मार्गावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या उपक्रमातून नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.
यावेळी गुणवंत कामगार कल्याण मंडळाचे शहराध्यक्ष महंमद शरीफ मुलाणी, खजिनदार बाळासाहेब साळुंके, भरत शिंदे, नंदकुमार धुमाळ, पांडुरंग सुतार, संभाजी नाटक, सुनील पाटील, राजेश चौधरी, प्रकाश गडवे तसेच महापालिकेचे अधिकारी शांताराम माने, मंगेश वारके, तेजस सुडके, आकाश शिरसाट, नीलेश अवधूते व पोलिस अधिकारी उपस्थित होते.
या उपक्रमाची सुरुवात रंगतदार पथनाट्याद्वारे करण्यात आली. ‘स्वच्छता हीच सेवा’, ‘कचरा कचराकुंडीतच टाका’,‘स्वच्छता आपली जबाबदारी,’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. पालखी सोहळ्यात वाटप होणाऱ्या केळी, पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिक वस्तू यांचा कचरा रस्त्यावर फेकू नये, यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
या अभियानात गुणवंत कामगार कल्याण मंडळाचे कार्यकर्ते आणि महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. आंबेडकर पुतळा चौकात अभियानाला सुरुवात झाली. पालखी मार्गावरील कचरा गोळा करून तो व्यवस्थित भरून कचऱ्याच्या गाडीमधून नेण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन बाळासाहेब साळुंके,नंदकुमार धुमाळ व रघुनाथ फेगडे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महंमदशरीफ मुलाणी यांनी केले; तर भरत शिंदे यांनी आभार मानले.