नागपूर - ‘भाजपच्या अकरा वर्षांच्या कार्यकाळात देशभर रस्त्यांचे जाळे विणले. उड्डाण पुलांची निर्मिती केली. मोदी सरकारच्या कार्यकाळात सर्वच क्षेत्रात देशाचा झपाट्याने विकास झाला आहे.
भविष्यात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही याकडे जास्त लक्ष देण्याचे आपण ठरवले आहे. त्याकरिता मी अलीकडे शेतीमध्ये अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली आहे,’ असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
‘मोदी सरकार, ग्यारह साल बेमिसाल’ या कार्यक्रमांतर्गत शनिवार गडकरी यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांनी त्यांची मुलाखत घेतली. गडकरी म्हणाले, ‘देशातील ६५ टक्के लोकसंख्या गावात राहाते. गाव-खेडे समृद्ध झाले पाहिजे, असे आमचे धोरण आहे.
त्यासाठी शेतकऱ्याचे उत्पन्न वाढविण्याच्यादृष्टीने आमचे कार्य सुरू आहे. शेतकरी आज केवळ अन्नदाताच राहिला नसून, तो ऊर्जा, इंधन, बिटोमीन आणि हवाई इंधन दाता बनला आहे. या माध्यमातून शेतकरी आता आर्थिकदृष्ट्या सक्षमही होत आहे.
विदर्भात मदर डेअरीच्या माध्यमातून दुधाचे उत्पन्न वाढविण्याबरोबरच आम्ही येथे बांबू लागवडही करत आहोत. यामुळेही शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम करण्याचा प्रयत्न होत असून अशा विविध पर्यायांच्या माध्यमातून शेतकऱ्याला सक्षम करत आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितेल.
पिक्चर अभी बाकी है...
आगामी २०२९ मध्ये तुम्ही कुठल्या रूपात आम्हाला बघायला मिळणार? या प्रश्नावर गडकरी यांनी ‘पिक्चर अभी बाकी है‘! असे उत्तर देऊन पक्ष जी भूमिका देईल ते काम करू असे स्पष्ट केले. मी तृप्त आहे अशीही पुस्ती त्यांनी जोडली.
भाजपचे हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व
‘भाजपचे हिंदुत्व पूजापाठ किंवा उपासनेशी संबंधित नाही. हा राजकारणाचाही विषय नाही. हिंदुत्व जीवन पद्धती आहे. भाजपचे हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे. आपल्या देशाची राज्यघटना आहे आणि घटनेवरच देश सुरू आहे. कोणी कोणाच्या धर्माच्या विरोधात नसल्याचे त्यात दिसून येईल. भारतीय, हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व एकाच नाण्याची बाजू आहेत,’ असे गडकरी यांनी सांगितले.
विकासकामांना चालना
११ वर्षात शिक्षण, आरोग्य, कृषी, रोजगार सर्वच क्षेत्रात कामे
एकेकाळी नक्षलग्रस्त गडचिरोली आता ‘स्टील हब’ म्हणून उदयास आला
गडचिरोलीत ७.५० कोटीची गुंतवणूक होत आहे
नव्या तंत्रज्ञानाने संत्री उत्पादन ३-४ पटीने वाढणार
वर्षभरात भारतात माल वाहतूक खर्च नऊ टक्क्यांवर येऊन निर्यात दीड पटीने वाढेल
नागपुरात एक लाख कोटी रुपयांची कामे केली
पुणे विभागात ७ लाख कोटींची कामे
भारताचा वाहन उद्योग पाच वर्षांत जगात पहिल्या क्रमांकावर असेल
सौभाग्य योजनेतून तीन कोटी लोकांना वीज जोडणी
स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत १२ कोटी कुटुंबांना शौचालय
राज्यात २० वर्षांपासून बंद पडलेले सिंचन प्रकल्प सुरू करण्यासाठी सहा हजार कोटी दिले
एक लाख कोटी रुपयांचा मुंबई -दिल्ली रस्ता बांधला