उमेद – कचरावेचक स्त्रियांची सन्मानाने जगण्याकडे वाटचाल…!
Marathi June 22, 2025 08:25 AM

>> सुरेश चव्हाण

कचरा वेचून उदरनिर्वाह करण्याच्या दुष्टचक्रात अडकलेल्या स्त्रियांच्या दैनंदिन समस्या, त्यांच्या मुलांचं शिक्षण व सर्वांगीण विकास, स्त्रियांवरील लैंगिक अत्याचार, व्यवस्थेकडून होणारा अन्याय, कौटुंबिक हिंसाचारअशा प्रश्नांसाठी 'स्त्री मुक्ती संघटने'मार्फत नवी मुंबईमध्ये 'वृषाली मगदूम' यांचा गेली 21 वर्षे लढा सुरू आहे?

गेली 21 वर्षे नवी मुंबई परिसरातील कचरा वेचक स्त्रियांनी सन्मानाने जगण्यासाठी प्रयत्न करणे, बलात्काराला बळी पडलेल्या स्त्रिया व मुलींना न्याय मिळवून देणे, कामाच्या ठिकाणी होणाऱया लैंगिक अत्याचाराला वाचा फोडणे, कौटुंबिक हिंसाचार थांबवणे अशी कामे वृषाली मगदूम व त्यांचे सहकारी सातत्याने करत आहेत. कष्टकरी, कचरा वेचक महिलांच्या आयुष्यात परिवर्तन व त्यांच्या मुलांचे भविष्य घडविण्यासोबतच त्यांना त्यांचे आयुष्य कचऱयातच काढावे लागू नये यासाठी त्या धडपडत आहेत.

वृषाली यांचा अजित मगदूम यांच्यासोबत विवाह झाला आणि त्यांच्या सामाजिक कार्याची खऱया अर्थाने सुरुवात झाली. कारण अजित यांनाही सामाजिक कार्याची आवड आहे. ‘कोरेगाव’ येथे स्थायिक झाल्यानंतर तेथील ‘सत्यशोधक’ संस्थेच्या माध्यमातून त्यांनी दुष्काळग्रस्तांसाठी भरीव काम केलं. त्यांच्या छोटेखानी व्यवसायातून मिळणाऱया उत्पन्नातून त्यांनी कोरेगाव येथे अंधांसाठी शाळा सुरू केली. हे काम सुरू असताना त्यांचे ‘केसरी’ वृत्तपत्रातून नैतिक मूल्ये, भ्रष्टाचार अशा विषयांवर लेखन सुरू होते. 1986 साली त्या नवी मुंबई येथे राहायला आल्यानंतर त्यांना कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात प्राध्यापिकेची नोकरी मिळाली व त्या इंग्रजी साहित्य शिकवू लागल्या. त्याच काळात ‘स्त्रीमुक्ती संघटनेच्या कौटुंबिक सल्ला केंद्रात’ही त्या जाऊ लागल्या. कौटुंबिक सल्ला केंद्रात काम करत असताना 2004 साली ‘स्त्री मुक्ती संघटने’ने कचरा वेचक महिलांसाठी काम करायचे ठरवले होते. गरीब वस्त्यांमध्ये राहणाऱया, उकिरडय़ावरचा कचरा गोळा करणाऱया महिलांमध्ये जाऊन त्यांच्यात आरोग्य आणि शिक्षणाविषयीची जागृती निर्माण करून त्यांना मूलभूत हक्क मिळवून देणे हे त्यांच्यापुढे आव्हान होते, जे अजूनही आहे.

या महिलांनी सुरुवातीला संघटनेच्या उपक्रमाला फारसा प्रतिसाद दिला नाही. काही काळाने हळूहळू त्यांच्यात जागृती निर्माण होऊन त्यांना रेशनकार्ड तसेच महापालिकेकडून ओळखपत्रे मिळवून दिली. त्यांची बँकेत खाती उघडून दिली. यातूनच मग या महिला एकत्र येऊ लागल्या. यानंतर त्यांच्यासाठी प्रशिक्षण वर्ग सुरू झाले. त्यांच्या मुलांसाठी बालवाडी सुरू करणे असे उपक्रम वृषालीताईंनी सुरू केले. यातून या स्त्रिया धीट होऊ लागल्या व त्या त्यांचे प्रश्न उघडपणे मांडू लागल्या.

‘स्त्राr मुक्ती संघटने’चे नवी मुंबई परिसरातील काम प्रामुख्याने वृषालीताई बघतात. (मुंबई व आजूबाजूच्या परिसरात अशा प्रकारचे काम ‘स्त्री मुक्ती संघटने’च्या कार्यकर्त्या ज्योतीताई म्हापसेकर, अमोल केरकर व त्यांचे इतर सहकारी करत आहेत.) नवी मुंबईतील अकरा झोपडपट्टय़ांमधील एक हजारांहून अधिक कचरा वेचक स्त्रिया त्यांनी एकत्र आणल्या. बहुतांशी मराठवाडा, धाराशिव येथून आलेल्या या गरीब वर्गातील स्त्रिया आहेत. पण आज यातल्या अनेक स्त्रिया आत्मविश्वासाने वावरताना दिसतात तसेच इतरांचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत करताना दिसतात. त्यांचे बचत गटही आहेत आणि डम्पिंग ग्राऊंडवर जाऊन कचरा वेचण्याच्या नकोशा कामातून त्यांची काही अंशी सुटका झाली आहे.

आज या स्त्रिया परिसरातील इमारतींमधील ओला व सुका कचरा वेगळा करतात. ओल्या कचऱयातून खत बनवून, सुका कचरा संस्थेच्या माध्यमातून पुनर्वापरासाठी देतात. अशा स्त्रियांच्या मुलांना घरामध्ये अभ्यास करण्यासाठी जागा पुरत नसल्याने संघटनेमार्फत महापालिकेच्या कम्युनिटी सेंटरमध्ये संध्याकाळी अभ्यास वर्ग घेतले जातात. आठ झोपडपट्टय़ांमधील 390 मुले तिथे शिकत आहेत. त्यांच्यासाठी कॉम्प्युटर व शिवणकामाचे वर्ग सुरू केले आहेत. शिवाय दानशूर व्यक्तींकडून देणगी मिळाल्यामुळे अनेक मुले उच्च शिक्षणही घेत आहेत. त्याचबरोबर 270 महिलांना नवी मुंबई महापालिका कचरा व्यवस्थापनामध्ये कामे मिळाली आहेत.

‘स्त्राr मुक्ती संघटने’च्या कामाबरोबरच नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या ‘गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंध समिती’वर वृषालीताई सल्लागार म्हणून काम पाहतात. लैंगिक अत्याचार समिती, महिला व बालविकास, जि. ठाणे आदी समित्यांवर त्या कार्यरत आहेत. या कार्यासाठी त्यांना ‘संत गाडगे महाराज स्वच्छता अभियान पुरस्कार’, रयत शिक्षण संस्थेतर्फे ‘आदर्श शिक्षिका पुरस्कार’, महात्मा फुले प्रतिष्ठान, नांदेड, ‘नवी मुंबई भूषण’ असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ही कामे करत असताना त्यांची खरी कसोटी लागते ती, लैंगिक अत्याचाराचे प्रश्न सोडवताना. समाजाची नकारात्मक मानसिकता, पोलिसांचे सहकार्य न मिळणे, रुग्णालयाकडून हवी तशी मदत न मिळणे; यामुळे पीडित मुली-स्त्रियांना न्याय मिळवून देणे अवघड होते. अशा परिस्थितीत व्यवस्थेशी झगडताना कधी कायद्याचा बडगा दाखवत, तर कधी ‘स्त्री मुक्ती संघटने’मार्फत दबाव आणत प्रश्न सोडवावे लागतात. बलात्कारीत मुलीला न्याय मिळवून देण्याबरोबरच तिच्या आरोग्याची, काही वेळा तिला होणाऱया बाळाची योग्य सोय करणे, तिला तिच्या पायांवर उभे करणे या गोष्टी वृषालीताई सहकाऱयांच्या मदतीने करताना दिसतात.

दुसरे म्हणजे कार्यालयीन ठिकाणी होणारा अत्याचार. सिडको, नवी मुंबई महापालिका, स्टेट बँक ऑफ इंडिया, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल अशा ठिकाणी ‘विशाखा गाइडलाईन्स’ अंतर्गत असलेल्या समितीत स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधी म्हणून त्यांचा सहभाग असतो. ज्यामुळे तटस्थपणे न्याय देणे शक्य होते. गेली काही वर्षे त्या राज्य शासनाच्या समितीत काम करत आहेत. गैरकृत्ये करणाऱया काही सोनोग्राफी केंद्रांवर छापे मारले गेले. त्यातून तेथील डॉक्टरांना अटकही झाली. एकदा तर बनावट आई बनून एका तरुणीबरोबर त्यांनी ‘स्टिंग ऑपरेशन’ घडवून ते सोनोग्राफी केंद्र बंद पाडले. हे सर्व करताना, नोकरी, घर सांभाळून त्यांचे लेखनही चालू आहे. आतापर्यंत त्यांची अकरा पुस्तके प्रकाशित झाली आहेत व त्यांच्या पुस्तकांनाही पुरस्कार मिळाले आहेत. त्याचबरोबर कचरा वेचकांची परिसर सखी विकास संस्था, अन्नपूर्णा परिवार, अन्वय प्रतिष्ठान या संस्थांबरोबरही त्यांचे काम सुरू आहे.

ureshkchavan@gmail.com

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.