अजितदादा की चंद्रराव तावरे? माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत 88 टक्के मतदान, कोण जिंकणार?
GH News June 22, 2025 11:05 PM

Baramati Malegaon Sugar Factory Election : बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या कारखान्याच्या निवडणुकीला 88.50 टक्के मतदान झाले आहे. बारामतीतील प्रशासकीय भवन येथे मतमोजणी होणार आहे. मतदान पेट्या बारामतीमधील शासकीय भवन येथे जमा करण्यात आल्या आहेत. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल लागणार 24 जून रोजी लागणार आहे. त्याआधी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या भागात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय.

दिवसभरात 88 टक्के मतदान झाले

माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतदानाची प्रक्रिया संपलेली आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत 84.52 टक्के मतदान झाले होते. सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची आकडेवारी 90 टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र या निवडणुकीसाठी एकूण 88.50 टक्के मतदान झाले आहे. मतदान केंद्रावरून सर्व बॅलेटपेपर युनिट बारामती शहरातील प्रशासकीय भवनला नेण्यात आले आहेत.

67 मतदान केंद्रांवर आज बॅलेट पेपर पद्धतीने मतदान

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार विरुद्ध चंद्रराव तावरे असा थेट सामना झाल्याचे पाहायला मिळाले जवळपास 67 मतदान केंद्रांवर आज बॅलेट पेपर पद्धतीने मतदान प्रक्रिया पार पडली. निवडणूक अजित पवार यांनी चांगलीच प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे आता या निवडणुकीत नेमकं कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

निवडणुकीनंतर अजित पवार नेमकं काय म्हणाले?

ही निवडणूक संपल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सकाळपासून कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर हास्य ओलांडून वाहतंय. कोणाला विश्वस्त म्हणून निवडून द्यावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. मात्र 24 तारखेपर्यंत वाट पाहावी लागेल, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. तसेच अजित पवार समोर असताना चेयरमन कोण होणार म्हटल्यावर कार्यकर्त्यांनी अजितदादांच्या नावाच्या घोषणा दिल्या.

अजित पवार, तावरे यांच्यात शब्दिक युद्ध

या निवडणुकीदरम्यान बारामतीमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. येथे अजित पवार आणि चंद्ररावर तावरे हे दोन्ही नेते एकमेकांवर टीका करताना दिसत होते. एवढं वय झालं तरी अजूनही तावरे निवडणूक लढवतच आहेत. थांबलं पाहिजे, अशी टीका अजित पवार यांनी केली होती. तर मी 100 वर्षे जगणार आहे. मी शेवटपर्यंत निवडणूक लढवणार, असं थेट प्रत्युत्तर तावरे यांनी दिलं होतं.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.