तात्या लांडगे
सोलापूर : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी त्रिभाषा सूत्र निवडले. मात्र, हिंदीशिवाय अन्य तिसऱ्या भाषेचे शिक्षकच उपलब्ध नाहीत. आता सरल पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांकडून तिसऱ्या भाषेचे पसंतीक्रम घेतले जाणार आहेत. त्यानंतर राज्याचा शालेय शिक्षण विभाग त्या त्या भाषेचे शिक्षक कंत्राटी तत्त्वावर भरणार आहे. विद्यार्थ्यांनी निवडलेल्या भाषांनुसार अंदाजे आठ ते दहा हजार शिक्षक भरावे लागतील, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
मराठी, इंग्रजीनंतर पहिलीच्या विद्यार्थ्यांना आता तिसरी भाषा निवडावी लागणार आहे. पहिलीचा विद्यार्थी दुसरी, तिसरी किंवा चौथी गेल्यावरही त्याची तिसरी भाषा बदलू शकणार आहे. त्यासाठी त्या विद्यार्थ्यांसाठी त्या त्या भाषेचे तज्ज्ञ शिक्षक नेमावेच लागणार आहेत. नवीन धोरण स्वीकारल्याने त्यावर कायमचा मार्ग काढावा लागणार आहे. त्याच्या अभ्यासासाठी प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालक शरद गोसावी आणि महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक डॉ. राहुल रेखावार यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ते मंगळवारी (ता. २४) शिक्षण आयुक्तांना त्यांचा अहवाल सादर करणार आहेत. त्यानंतर तिसरी भाषा निवडण्याची कार्यपद्धती, तिसऱ्या भाषेची विद्यार्थ्यांकडून पसंती घेणे, पुस्तकांची उपलब्धता आणि कंत्राटी शिक्षक भरती, यावरील कार्यवाही ऑगस्टअखेर पूर्ण होईल, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
मंगळवारी निश्चित होईल पुढील कार्यवाही
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी त्रिभाषा सूत्र स्वीकारले आहे. त्यानुसार तिसऱ्या भाषेसाठी विद्यार्थ्यांकडून पसंतीक्रम घेतला जाईल. २० पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या विद्यार्थ्यांना ती भाषा ऑनलाईन शिकविली जाईल, पण त्यांना ऑफलाईनही शिकवावे लागेल. विद्यार्थी जी भाषा निवडतील, त्या भाषेचे शिक्षक उपलब्ध आहेत का, हे पाहून कंत्राटी शिक्षक भरतीसंदर्भातील निर्णय होईल. पण, यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा लागेल.
- सचिंद्र प्रताप सिंह, शिक्षण आयुक्त
विद्यार्थ्यांना तिसऱ्या भाषेची पुस्तके ऑगस्टमध्येच
राज्यातील बहुतेक शाळा १६ जूनपासून सुरू झाल्या असून आता विदर्भ, मराठवाड्यातील शाळा २३ जूनपासून सुरू होत आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके दिली गेली, पण तिसऱ्या भाषेची पुस्तके त्यांना अजूनही मिळालेली नाहीत आणि त्या विद्यार्थ्यांची पसंती देखील जाणून घेतलेली नाही. आता इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची तिसऱ्या भाषेची पसंती घेऊन त्यांना ती पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यासाठी ऑगस्ट उजाडेल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.