उरण, ता. २३ (वार्ताहर) : विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरी अजून कृत्रिम रक्ताची निर्मिती करू शकले नाही, रक्त हे केवळ दात्याच्या शरीरातूनच मिळू शकते. सध्या राज्यातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन राज्याच्या आरोग्य मंत्रालयाच्या सूचनेनुसार आणि जिल्हाधिकारी रायगड यांच्या आदेशावरून जागतिक रक्तदिनाचे औचित्य साधून प्रत्येक ग्रामपंचायतीने रक्तदान शिबिर राबविणे सक्तीचे केले आहे. त्या अनुषंगाने नुकताच दिघोडे ग्रामपंचायतीच्या वतीने समर्पण ब्लड सेंटर यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. दिघोडेचे सरपंच कीर्तीनिधी हसुराम ठाकूर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी उपसरपंच संदेश पाटील, सदस्य कैलास म्हात्रे, अभिजित पाटील, अलंकार कोळी, उज्ज्वला म्हात्रे, अपेक्षा कासकर, आरती कोळी, रेश्मा ठाकूर, ग्रामविकास अधिकारी मच्छगंधा पाटील यांच्यासह समर्पण ब्लड सेंटरचे डॉ. देसाई आणि शिबिराला सहकार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते सुनील वर्तक आदी मान्यवर उपस्थित होते.