मुरूडमध्ये रानभाज्यांची आवक वाढली
आदिवासी महिलांना मिळतोय रोजगार
मरूड, ता. २३ (बातमीदार) ः मुरूड तालुक्यात आतापर्यंत ४२५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे जमिनीची उफळ पूर्ण झाल्याने नद्या, नाले भरून वाहत आहेत. परिणामी रानभाज्यांसाठी पोषक असे वातावरण तयार झाल्याने मुरूडलगतच्या डोंगर-कपारीत त्यांची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे शिघ्रे नवीवाडी, टक्याची वाडी, तेलवडे आदिवासी वाडी आदी वाड्यांमधील महिला मोठ्या प्रमाणात उगवलेल्या रानभाज्या जंगलातून आणून त्यांची बाजारपेठेमध्ये विक्री करत आहेत. त्यामुळे आदिवासी महिलांच्या हातात पैसे येत असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे.
मुरूड बाजारात आदिवासी महिला भरपावसात रानभाज्या विकताना दिसून येत आहेत. रानभाज्यांमध्ये कुडा, खवणी, शेवगा, भारंग, करटोली, पेवा, पिंपळ, खडक चिरा, आंबट वेल, दीडा, कुरडू, अळु, गरूडवेल आदींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. रानभाजी काढण्यास खूप मेहनत घ्यावी लागते. यंदा मेमध्ये भरपूर पाऊस पडल्याने जंगलामध्ये रानभाज्या मोठ्या प्रमाणात उगवल्या आहेत. शिवाय यंदा त्यांचे प्रमाणही जास्त असल्याचे विक्रेत्या लता वाघमारे या आदिवासी महिलेने माहिती दिली. या रानभाज्या खूपच माफक आहेत. साधारण २० रुपयाला एक भाजीचा वाटा, अशी विक्री होत आहे. या रानभाज्या पौष्टिक असून, त्याची चवदेखील उत्तम असल्याने खवय्यांकडून चांगली पसंती मिळत आहे. त्यामुळे त्याची विक्रीदेखील मोठ्या प्रमाणात होत आहे.