आपल्या किशोरवयीन मुलांना एक व्यक्ती म्हणून प्रतिष्ठा आहे, हे अद्यापही अनेक पालकांच्या पचनी पडत नाही.
‘गुरुजी, माझ्या मुलाला हेदेखील शिकवा की फसवून मिळालेल्या यशापेक्षा सरळ आलेले अपयश श्रेयस्कर आहे. आपल्या कल्पना, आपले विचार यांच्यावर दृढ विश्वास ठेवायला हवा त्याने. बेहेत्तर आहे सर्वांनी त्याला चूक ठरवलं तरी!’ अब्राहम लिंकन यांनी मुख्याध्यापकांना लिहिलेल्या कथित पत्रातील हा एक अंश.
खरे तर हे संपूर्ण पत्र म्हणजे शिक्षणाविषयीच्या आणि पालकत्वाविषयीच्या एक प्रगल्भ दृष्टिकोनाचे प्रतिबिंब आहे. त्यामुळेच शाळाशाळांमधील मुख्याध्यापकांच्या दालनात ते लावलेले असते. पण या विचारांचा गंधही नसल्याची अंधःकारमय स्थिती आपल्याकडील शाळांच्या खोल्यांमध्ये दाटलेली दिसते.
शिक्षण आणि करीअर याविषयीच्या विपरीत कल्पनांमुळे ज्यांच्या हातून उद्याची पिढी घडणार तीच मंडळी कथित गुणवत्ता आणि ‘गुण’प्रतिष्ठेच्या चौकटीमध्ये किती करकचून आवळली गेली आहे, याचे भीषण आणि विदारक वास्तव आटपाटी तालुक्यातील नेलकरंजी गावातील घटनेतून दिसून आले.
केवळ सरावपरीक्षेमध्ये कमी गुण पडल्याच्या रागातून संतापलेल्या एका पित्याने स्वतःच्या मुलीलाच जात्याच्या लाकडी खुंट्याने जबर मारहाण केली. त्यात तिचा जीव गेला. ही मारहाण करणारी व्यक्ती शिक्षक आहे, ही आणखी एक धक्कादायक बाब. पाल्याच्या विकासात शिक्षणाची नेमकी भूमिका काय, मुळात शिक्षणाचे प्रयोजन काय याविषयीच आपल्याकडील बहुसंख्य पालकांच्या आणि शिक्षकांच्याही मनात गोंधळ असेल तर ती कमालीच्या चिंतेची बाब ठरते.
पित्याच्या क्रौर्याला बळी पडलेली मुलगी काही मूलभूत प्रश्न मागे ठेवून गेली आहे. जीवनाच्या अन् करिअरच्या शर्यतीमध्ये खरेच परीक्षेतील ‘गुण’ एवढे महत्त्वाचे असतात का, केवळ गुण मिळाले म्हणजेच तुम्ही ज्ञानवंत असे काही असते का, प्रत्यक्ष परीक्षेमध्ये उत्तरपत्रिका कोऱ्याच ठेवणारे पण पुढील आयुष्यात यशाची गरुडझेप घेणारे ‘बॅकबेंचर’ आपल्याला काय संदेश देऊ पाहतात, अशी प्रश्नांची मालिकाच समोर येते. त्यातच अनेक उपप्रश्नही दडलेत.
ज्या मुलीला कधीकाळी अंगाखांद्यावर खेळवले त्या लेकीने ‘तुम्हालाही कमीच गुण मिळाले होते, अन् शेवटी शिक्षकच झालात ना’, असे प्रत्युत्तर दिल्याने पित्याच्या मनातील अहंकाराने फणा काढला असणार. आपली मुलगी ही जणू मालकीची वस्तू असल्यासारखे तिला बदडले. शैक्षणिकच नव्हे तर सामाजिक बाबतीतील एका गंभीर दुखण्याकडे या घटनेने आपले लक्ष वेधले आहे.
केवळ परीक्षा आणि गुणांच्या ‘रेस’मध्ये आपले मूल पुढे राहावे म्हणून पालक जो आटापिटा करतात, त्याचे भयंकर रूप या घटनेने दाखवून दिले. आपल्या मुलांकडे आपण ‘साधन’ म्हणून पाहातो, ही अत्यंत दुर्दैवाची बाब. पाल्याला त्याच्या गतीने आणि क्षमतेनुसार फुलू द्यावे, आपण फक्त पूरक, साह्यकारी भूमिका घ्यावी, अशी प्रगल्भता फार थोड्या पालकांकडे असते.
शिक्षण आणि ताणतणाव असे समीकरण तयार झाले आहे. आटपाडीजवळील घटनेतील मुलीला डॉक्टर व्हायचे होते. वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश मिळावा म्हणून ती तयारी करत होती. यासाठी तिने खासगी शिकवणीही लावली होती. खरेतर तिला ज्या परीक्षेत अपयश आले ती अंतर्गत सरावाची परीक्षा होती.
अशावेळी पालकांची जबाबदारी आहे ती लेकीला ‘पुन्हा जोमाने अभ्यास कर’, असे सांगत धीर देण्याची, प्रेरित करण्याची. ते तर दूरच. या बापाने मुलीला बेदम मारहाण केली. ही कसली शिक्षा? आणि अशी शिक्षा करणारा हा कसला बाप? बहुतेक प्रगतदेश आनंदी, चौकटबाह्य अन् मुक्त शिक्षणव्यवस्थेचा आग्रह धरताना दिसतात.
मुलांना शिकविताना शिक्षा शक्यतो करूच नयेत, वेळ पडली तर ज्यातून सुधारणा होईल, अशा प्रकारच्या अभिनव पद्धतीच्या सौम्य शिक्षा कशा देता येतील, याविषयी त्या देशांत सखोल विचार होत असतो. आपल्याकडे मात्र अनेकांना असे विचार पचनी पडत नाहीत. आपल्या किशोरवयीन मुलांना एक व्यक्ती म्हणून प्रतिष्ठा आहे, हे अद्याप अनेक पालकांना कळत नसेल तर त्यांनाच माणुसकीचे मूलभूत धडे शिकविण्याची गरज आहे.
या निमित्ताने आणखीही काही आनुषंगिक प्रश्नांची चर्चा होणे आवश्यक आहे. करिअरची अनेकानेक क्षेत्रे खुली झाली असताना डॉक्टर वा इंजिनिअर होण्यासाठी एवढी उर फुटेस्तोवर धावाधाव कशाला करायची? परीक्षेतील अपयश आणि त्यामुळे येणारे नैराश्य आणि ताणतणाव यावर मात करण्यासाठी पालकांनीच पाल्यांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहायला हवे.
आपल्याकडे नेमके याच्या उलट घडते. परीक्षेतील अपयश पालकही स्वतःसाठी जीवनमरणाचा प्रश्न करून ठेवतात; मग या ‘कठीण’ शर्यतीत कुणाचा तरी हकनाक बळी जातो. त्यातही वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षणात स्वतःची ‘कारखानदारी’ चालवीत विद्यार्थी आणि पालकांचे शोषण करणाऱ्या खासगी शिकवण्यांबाबत तर बोलायलाच नको.
या शैक्षणिक अनागोंदीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी तळापासून बदल घडवायला हवा. या बदलांची पाळेमुळे ही पालक आणि पाल्यांच्या मानसिकतेमध्ये दडलेली आहेत. कुणीतरी आपल्यावर स्पर्धा लादत असेल तर त्यात आपण कोठपर्यंत धावायचे आणि का, याचा गांभीर्याने विचार करायला हवा.