Shubman Gill: भारताचं हेडिंग्ले कसोटीत नेमकं कुठे चुकलं? इंग्लंडविरुद्ध पहिल्या पराभवानंतर कर्णधार गिलचे स्पष्टीकरण
esakal June 25, 2025 06:45 AM

भारतीय क्रिकेट संघाची इंग्लंड दौऱ्याची सुरुवात पराभवाने झाली आहे. तेंडुलकर - अँडरसन ट्रॉफी या कसोटी मालिकेतील हेडिंग्लेला झालेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडने भारताविरुद्ध ५ विकेट्सने विजय मिळवला. त्यामुळे इंग्लंडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२५-२७ स्पर्धेची सुरुवात विजयाने करण्यासोबतच मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

या सामन्यात इंग्लंडने भारताने दिलेले ३७१ धावांचे मोठे लक्ष्य पाचव्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात ८२ षटकात पूर्ण करत विजय मिळवला. या सामन्यात भारताने पहिल्या डाव ४७१ धावा केल्या होत्या, तर इंग्लंडने पहिल्या डावात ४६४ धावा केल्या होत्या. त्यामुळे भारताला ६ धावांची आघाडी मिळाली.

दुसऱ्या डावात भारताने ३६४ धावा केल्या आणि पहिल्या डावातील आघाडीसह इंग्लंडसमोर विजयासाठी लक्ष्य ठेवलं होतं. पण इंग्लंडने शेवटच्या डावात सरस खेळ केला.

ENG vs IND, 1st Test: इंग्लंडने मैदान मारलं! भारताविरुद्ध हेडिंग्लेत आजपर्यंत इतिहासात जे जमलं नव्हतं ते करून दाखवलं

विशेष म्हणजे भारताकडून या सामन्यात ५ शतके झाली होती. रिषभ पंतने (१३४ आणि ११८) दोन्ही डावात शतक केले होते. तसेच शुभमन गिल (१४७) आणि यशस्वी जैस्वालने (१०१) धावांची खेळी पहिल्या डावात केलेली.

तसेच दुसऱ्या डावात केएल राहुलनेही (१३७) शतक केले होते. जसप्रीत बुमराहने गोलंदाजी करताना पहिल्या डावात ५ विकेट्सही घेतल्या. पण या प्रयत्नांनतरही भारताला पराभवाचा सामना करावा लागला.

या सामन्यात भारताकडून अनेक झेल सुटले, यशस्वी जैस्वालकडूनच ४ झेल सुटले. तसेच भारताची खालची फळी फलंदाजीत फारसं योगदान देऊ शकले नाही. हेच भारताच्या पराभवाचं कारण ठरल्याचेशुभमन गिलने सांगिलते.

सामन्यानंतर गिल म्हणाला, 'मला वाटतं हा शानदार कसोटी सामना होता. आम्हाला काही संधी मिळाल्या, पण आम्ही झेल सोडले आणि आमची खालची फळी फार फलंदाजीत योगदान देऊ शकली नाही. पण संघाने घेतलेल्या एकूण मेहनतीसाठी अभिमान वाटतोय.'

'काल आम्ही विचार करत होतो की दुसऱ्या डावात ४३० च्या आसपास धावा करू आणि डाव घोषित करू. पण दुर्दैवाने आमच्या शेवटच्या ६ विकेट्स २०-२५ धावांतच पडल्या, जे की चांगले लक्षण नाही. जरी आज त्यांच्या सलामीवीरांनी चांगली भागीदारी केली असली, तरी आमच्याकडे संधी होती, पण गोष्टी आमच्या बाजूने गेल्या नाहीत.'

भारताने पहिल्या डावात शेवटच्या ६ विकेट्स ४१ धावात गमावल्या होत्या, तर दुसऱ्या डावात शेवटच्या ६ विकेट्स ३१ धावात गमावल्या.

याबाबत बोलताना गिल म्हणाला, 'नक्कीच आम्ही त्याबद्दल चर्चा केली, पण जेव्हा तुम्ही मैदानात असता, तेव्हा गोष्टी खूप वेगाने होतात. ही एक अशी गोष्ट आहे, ज्यावर आम्हाला आगामी सामन्यांसाठी काम करावे लागणार आहे. नक्कीच अशा खेळपट्ट्यांवर सहज संधी निर्माण होत नाहीत आणि त्यात आम्ही काही झेल सोडले. पण मला वाटतं की आमचा खूप युवा संघ आहे, ते अजूनही शिकत आहेत आणि आशा आहे की त्याबाबतीत आम्ही पुढच्या सामन्यात सुधारणा करू.'

याशिवाय गिल पुढे म्हणाला की 'आम्ही खूप धावा दिल्या नाहीत, पण चेंडू जुना झाला की धावा रोखणं कठीण होतं. अशावेळी सातत्याने विकेट्स घेणं महत्त्वाचं असतं, तरच सामन्यात टिकून राहता येतं. दुर्दैवाने बॅटच्या कडाला लागून आलेले चेंडू क्षेत्ररक्षकांच्या हातात गेले नाही,तर काही गोष्टी आमच्या बाजूने झाल्या नाहीत. इंग्लंडने जुन्या चेंडूवर चांगली फलंदाजी केली. त्यांनी संधीचा फायदा उचललाआणि सलामी भागीदारी सामन्याला कलाटणी देणारी ठरली.'

ENG vs IND, 1st Test: जैस्वालने कॅच सोडला अन् डकेटनं शतक ठोकलं! इंग्लंडच्या सलामीवीरांनी ७२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

या सामन्याच्या शेवटच्या दिवशी रवींद्र जडेजाला मदत मिळत होती. त्याबद्दल गिल म्हणाला, 'जडेजाने चांगली गोलंदाजी केली, त्याने काही संधी निर्माण केलेल्या.काही चेंडूंवर झेल मिळाले असते, पण रिषभ पंतने ते घेतले नाहीत. पण क्रिकेटमध्ये हे होतं.तुम्ही अशी अपेक्षा करू शकत नाही की प्रत्येक संधी आपल्याच बाजूने जाईल.'

या सामन्यात इंग्लंडकडून ४७१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बेन डकेटने शतक करताना झॅक क्रावलीसोबत सलामीला १८८ धावांची भागीदारी केली. ही भागीदारी इंग्लंडसाठी महत्त्वाची ठरली. दरम्यान जसप्रीत बुमराहच्या या मालिकेतील उपलब्धतेबद्दल गिलने सांगितले की सामन्यानुसार त्याचा विचार केला जाईल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.